श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
करोनाची साखळी तोडण्यासाठी रविवारपासून श्रीरामपूरकरांनी सर्वपक्षीय बंद उस्फूर्त पाळला आहे.
त्याचा उपयोग योग्य कामासाठी पालिका प्रशासनाने करावा, जर तो वापर योग्य पद्धतीने झाला तरच या बंदचा फायदा होईल,असे मत श्रीरामपूर शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडधे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर शहरातील सर्व भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच एक खिडकी योजनेसारखी एका ठिकाणी श्रीरामपूर शहरातील नागरिकांची करोनाच्या संदर्भात सर्व टेस्ट घेण्याची व्यवस्था करावी, जर रुग्ण करोना पॉझिटिव्ह आला तर त्याला अॅम्बुलन्स तसेच पुढील उपचारासाठी कोठे? आणि कसे जावे याचे सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणावरून व्हावे, नगरपालिकेने स्वतःचे श्रीरामपूर आतील जनतेसाठी कोविड बेड हॉस्पिटल त्वरित चालू करावे.
श्रीरामपूर शहरातील सर्व भागात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तेसुद्धा उचलण्याची व्यवस्था करावी. पाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अशुद्ध गढूळ तसेच त्याची चव सुद्धा वेगळ्या प्रकारची येत आहे. त्यामुळे श्रीरामपुरात लोकांना पिण्यासाठी पाण्याचे जार वापर करायची वेळ आली आहे. या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित झाले तरच हा बंद यशस्वी झाला असे सर्व श्रीरामपूरच्या जनतेला वाटेल.
कारण आठ दिवसांनी पुन्हा श्रीरामपूर ज्यावेळेस उघडेल त्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टीवर विचार करायला वेळ कमी पडतो. या आठ दिवसात या सर्व गोष्टी जर उपलब्ध झाल्या तर श्रीरामपूरकरांसाठी एक चांगली गोष्ट होईल, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी केली.