दिल्ली | Delhi
ओडिशातील (Odisha) जगन्नाथ पुरी (Jagannath Puri) येथे करोनामुळे (COVID19) सलग दुसऱ्या वर्षी भाविकांच्या गर्दीशिवाय जगन्नाथ यात्रा सुरु झाली असून भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रेसह नगर भ्रमण करायला निघाले आहेत. ही यात्रा २० जुलै पर्यंत सुरु राहणार आहे.
दरवर्षी या यात्रेत लाखोंच्या संखेने भाविक येतात मात्र करोनामुळे गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा भाविकांना सहभागी होता आलेले नाही. यंदा तीन हजार सेवादार आणि प्रशासन कर्मचारी या यात्रेत सहभागी आहेत. पुरी येथे रविवारी रात्री ८ पासून दोन दिवसांची संचारबंदी लागू केली गेली आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind), उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले, भगवान जगन्नाथच्या रथयात्रेच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना, विशेषत: ओडिशामधील सर्व भाविकांना माझे हार्दिक अभिवादन आणि शुभेच्छा. भगवान जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने सर्व देशवासीयांचे जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण असावे अशी माझी इच्छा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘रथ यात्रेच्या विशेष प्रसंगी सर्वांचे अभिनंदन. आम्ही भगवान जगन्नाथला नमन करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात चांगले आरोग्य आणि समृद्धी मिळावी ही प्रार्थना. जय जगन्नाथ! ‘
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अमित शहा यांनी सकाळी पहाटे अहमदाबादमधील भगवान जगन्नाथाची मंगला आरती केली. त्यानंतर देव-प्रतिमांना यात्रेसाठी बाहेर काढण्यात आलं. शहा परिवारासह आरतीमध्ये सहभागी झाले होते.
रथयात्रेच्या पूर्वी मंदिराची भव्य सजावट करण्यात आली होती. यासह मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आलं आहे. मंदिर परिसरात कसल्याही प्रकारच्या उपक्रमांना बंदी आहे. यात्रा व्यवस्थीतपणे पार पडावी यासाठी जवानांच्या 65 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये 30 जवान आहेत.