नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यातील अवैध धंदयाना लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा समन्वय नियंत्रण कक्षास नागरिकांचा थंड प्रतिसाद लाभत आहे.
एक महिन्यात फक्त तीस तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 8 तक्रारीचा निपटारा करण्यात आला आहे. तर 22 तक्रारीवर सबंधित विभागाकडून कारवाई सुरु आहे. अवैध धंद्यावर कारवाई कोणी करायची यावरुन पोलीस आयुक्त यांनी जिल्हाप्रशासनावर लेटर बॉम्ब टाकला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व इतर विभागानी एकत्र बैठक घेत समन्वय कक्ष स्थापन केला.
या नियंत्रण कक्षास आतापर्यंत 30 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 8 तक्रारी निकाली निघाल्या असून यातील 7 राज्य उत्पादन शुल्कच्या तर 1 जिल्हा खणीकर्म विभागाच्या आहेत. तर प्रलंबित असलेल्या तक्रारींत सर्वाधिक शहर पोलीस, ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारींचा समावेश आहे. नुतन पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी वसूली, टार्गेट आणि वाहनांवर कारवाई करणे हे आमचे काम नसल्याचे सांगितले.
ऐवढ्यावरच न थांबता जुगार, मटका आणि इतर अवैध धंद्याच्याही बाबींत हीच भूमीका घेत हे काम महसूल, राज्य उत्पादन आणि आरटीओ आणि अन्न व औषध प्रशासनाचे असल्याचे स्पष्ट केले. संबधित विभागांच्या खाते प्रमुखांना थेट पत्रही लिहीले. यावरुन प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाणक आले. यातच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे एक संयुक्त बैठक झाली. त्यातही पोलीस आयुक्तांनी आपली हीच भूमीका स्पष्टपणे मांडली.
त्यानंतर अखेर यावर तोडगा म्हणून सर्वच विभांगाचां मिळून एक समन्वय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापण करण्यात आला. या कक्षास प्राप्त होणार्या तक्रारी ज्या विभागाशी संबधित असतील त्यांच्याकडे पाठवून त्यांनी त्यावर तत्काळ कारवाई करुन त्याचा अनुपालन अहवालही संबधित मेलवर सादर करण्याचे आदेश देण्यात आले.