कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
उत्तर महाराष्ट्रातील प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यासह आजूबाजुच्या जिल्ह्यांतील किरकोळ व्यापारी हा स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केंद्रातील सरकार
सर्वोतोपरीने प्रयत्न करून व्यापारी, किराणा दुकानदार आणि सामान्य विक्रेता हा आत्मनिर्भर बनत चालला आहे. काळानुरूप छोटे व्यापारी, व्यावसायिकांना बदलावे लागणार आहे. स्पर्धेच्या युगात मोठ-मोठ्या विदेशी कंपन्या, उद्योगपतींच्या कंपन्यापुढे किरकोळ व्यापारी जगला पाहिजे. यासाठी छोट्या व्यापार्यांच्या अडचणी केंद्र शासनापर्यंत पोहचवून त्यांना न्याय मिळवून देऊ,असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. शामजी जाजू यांनी केले.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्यावतीने कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र व्यापार संघटना प्रतिनिधी मेळाव्याप्रसंगी शाम जाजू बोलत होते. अध्यक्षस्थानी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे होते. शाम जाजू म्हणाले, केंद्रातील सरकार व्यापार्यांच्या प्रश्नांवर विचार करेल कारण, प्रत्येक प्रश्नावर सध्याचे केंद्र सरकार अतिशय संवेदनशील आहे.
सुरुवातीला भारत देशातील आधुनिक तंत्रज्ञानात प्रामुख्याने संगणक, भ्रमणध्वनीला विशेष विरोध केला गेला मात्र आज त्याची खरी गरज निर्माण झाली असून त्यांचे महत्त्व वाढले आहे. योग्य वेळ आल्यानंतर योग्य निर्णय घ्यावाच लागतो. त्याप्रमाणे तुमच्या समस्या, प्रश्नांवर केंद्र सरकार निर्णय घेऊन अंमलात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.
काका कोयटे म्हणाले, पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे भारत देशात मॉल संस्कृती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांचा भांडाफोड आम्ही व्यापारी महासंघाच्यावतीने करत आहोत. यामुळे ग्राहकांची फसवणूक करून, फसव्या जाहिराती देऊन, छोटे-मोठे किराणा दुकानदार, व्यापारी यांच्यावर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संतोष मंडलेचा, सचिन निवगुणे, उद्योजक कैलास ठोळे, केशव भवर, नरेंद्र कुर्लेकर आदींसह उत्तर महाराष्ट्र व्य्पारी संघटनांचे प्रतिनिधी, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे आणि कोपरगाव महिला महासंघाच्या किरण डागा, किरण दगडे आदी महिलाही उपस्थित होत्या.
आभार व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी मानले तर प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले.