जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
महानगरपालिकेने 16 अव्यावसायिक गाळेधारकांना अवाजवी बीले दिल्याचा आरोप होत आहे. तसेच प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे.
या उपोषणादरम्यान दररोज वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे. सोमवारी गांधी मार्केटमधील गाळेधारकांनी चक्क साठ रुपये किंमतीच्या भाज्या साठ हजार किलो चढ्या दराने विक्री करण्याचे अनोखे आंदोलन केले.
या आंदोलनातून गाळेधारकांनी प्रशासनाला अवाजवी बिले दिल्याने काय नुकसान होते, असा संदेश दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषणात आज सोमवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत दिलीप पथर्यानी, दिलीप चौधरी, भगवान चौधरी, शाम शिंपी, प्रमोद निकुंभ यांनी तर दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत रवी बारी, किशोर सोनवणे, नितीन हेमनानी, रमेश हेमनानी, अमोल वाणी यांनी भाजीपाला विक्री आंदोलन करुन लक्ष वेधले.
आ. शिरिष चौधरींचा आंदोलनाला पाठींबा
साखळी उपोषणाला विविध संघटना संस्थांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी दूरध्वनीवरून संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम दादा सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ, वसीम काझी, पंकज मोमाया, हेमंत परदेशी, आशिष सपकाळे, विलास सांगोरे उपस्थित होते.