Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककृषी क्षेत्रात ‘स्वयंघोषित' सल्लागारांचा सुळसुळाट

कृषी क्षेत्रात ‘स्वयंघोषित’ सल्लागारांचा सुळसुळाट

उजनी । राम सुरसे Ujani

कृषी क्षेत्रात, डाळिंबाच्या बागांमध्ये ‘स्वयंघोषित सल्लागारां’चा सुळसुळाट झाला असून अशा बनवेगिरीमुळे शेती आणि शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.

- Advertisement -

वैद्यकीय क्षेत्रात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम आरोग्य विभाग नेहमी हाती घेते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. एखाद्या निष्णात डॉक्टरांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना औषधांची तोंड ओळख होते. कुठलेही शिक्षण घेतलेले नसताना जुजबी ज्ञानाच्या आधारे हे बोगस डॉक्टर रुग्णावर उपचार करतात. पण कधीकधी ते रुग्णांच्या जीवावर बेतते. त्यांच्यावर किमान गुन्हे तरी दाखल होतात. ‘

मात्र, आता कृषी क्षेत्रात असे डॉक्टर, सल्लागार अशी वेगवेगळी नावे किंवा स्वयंघोषित पदव्या घेऊन काही लोकांनी फसवण्याचा नवा धंदा मांडलाय. त्यांनी शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. शेतीत प्रगत असलेल्या महाराष्ट्र राज्यात त्यांनी धुमाकूळ घातलाय. डाळिंबावर आलेल्या रोगाच्या पाहणीसाठी गेलेल्या कृषी शास्त्रज्ञांना बोगस डाळिंब डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे झालेले नुकसान अनुभवायला मिळत आहे.

राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत नगर, पुणे, सांगली, सोलापूर, वाशिम, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यात डाळिंब बागांची लागवड वाढली आहे. नगदी असलेले पीक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देते. त्यामुळे या पिकाकडे शेतकरी वळले आहेत. हल्ली बहुतेक डाळिंब उत्पादक हे खत व्यवस्थापन, रासायनिक औषधे, बागांची निगा या करीता सल्लागार नेमतात.

अनेकदा त्यांना डाळिंब डॉक्टर, कन्सल्टंट, मार्गदर्शक असे म्हणतात. यातील काही कृषी पदवीधर आहेत. तर काही कृषी पदविकाधारक आहेत. पण काही डॉक्टर हे आठवी, नववी झालेले आहेत. ते पूर्वी फवारणीचे काम करत होते. हे काम करता-करता अनुभवाने काही थोडेफार डाळिंब पिकाचे संगोपन कसे करायचे ते शिकले.

मात्र, त्यांना फारसे तंत्रज्ञान माहीत नाही. काही विविध कंपन्यामध्ये मार्केटिंग करत होते. कंपनीच्या औषधांचे मार्केटिंग करताना ते ‘डाळिंब डॉक्टर’ झाले आहेत. जुजबी ज्ञानावर ते सल्लागाराचे काम करत आहेत. मात्र, त्यांनीच आता अनेक प्रश्र्न निर्माण केले आहेत.

डाळींब, टोमॅटो, द्राक्ष, मिरची, टरबूज, खरबूज या पिकातही ते सल्लागार आहेत. एकरी 5000 ते 10,000 रुपये शुल्क ते घेतात. त्यांचा थेट शेतकऱ्यांबरोबर संपर्क असतो. अनेक कंपन्या व कृषी सेवा केंद्राचे चालक त्यांना औषधे खपविण्यासाठी कमिशन देतात. त्यातून हे डॉक्टर चांगलेच भरभराटीला आले आहेत.

एकट्या नाशिक जिल्हयात त्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. अगदी दहावी नापास झालेले व्यक्ती डाळिंब शेतीचे डॉक्टर आहेत. कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेण्याऐवजी या बोगस डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. मात्र, अशा बोगस सल्लागारांमुळे डाळिंब उत्पादक चांगलेच गोत्यात आल्याचे पाहायला मिळत आहेत.

सिन्नर तालुक्यात डाळींब बागांवर पुन्हा तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मर रोगही आला आहे. यंदा एक जूनपासून पाऊस सुरू आहे. ढगाळ हवामान आहे. आद्रता जास्त आहे. त्यामुळे जिवाणू व बुरशीजन्य रोग वाढले आहेत. त्यातून यंदा डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. काही बागांवर जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगांची तीव्रता 40 ते 70 टक्कय़ांच्या दरम्यान आढळून येत आहे.

तसेच विविध किडींचा प्रादुर्भाव 5 ते 25 टक्कयांच्या दरम्यान आढळून येत आहे. बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग व विविध किडींचा प्रादुर्भाव होताना सध्या दिसत आहे. रोगास पोषक हवामान, उशिरा बहार धरणे, लागवडीमधील कमी अंतर, घनदाट शाखीय वाढ व त्यामुळे बागेमध्ये तयार झालेले रोगास पोषक हवामान, अनावश्यक रसायनांच्या (बुरशी नाशकांच्या/सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या) वारंवार फवारण्या तसेच साठलेल्या पाण्याचा निचरा न होणे, तण व्यवस्थापनाचा अभाव, बागेमधील अस्वच्छता (रोगट पाने व फळे बागेच्या आवारात विखरून पडलेल्या अवस्थेमध्ये) एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव. हा बोगस डॉक्टरांमुळे निर्माण झालेला मोठा गोंधळ समोर येत आहे.

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी जी रासायनिक औषधे वापरली होती, त्यांची शिफारस विद्यापीठाने केलेली नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

विशेष म्हणजे संजीवकांचा बेसुमार वापर करण्यात येत आहे. अनेक औषधे काय आहेत, त्यांचे नाव काय, कशासाठी वापरतात. त्याचा उल्लेख रहात नाही. सेंद्रिय, जैविक, ऑरगॅनिक असे नावे सांगून ती शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येतात. हुमीक अॅसिड, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ग्रोथ रेग्युलेटर, टॉनिक अशा नावाने ती शेतकऱ्यांना देण्यात येतात. मग त्याची फवारणी बागावर करण्यात येते. मध्यंतरी पीजीआर (प्लँट ग्रोथ रेग्युलेटर) यांना बंदी घालण्यात आली होती.

मात्र, आता ती उठली असून त्यातून हा गोरख धंदा सुरू आहे. त्यांची शिफारस शेतीत सुळसुळाट झालेले ‘बोगस डॉक्टर’ करत असल्याचे समोर येत आहे. काही सल्लागार चुकीची बुरशीनाशकांची व औषधांची शिफारस करतात. तेल्या, मर, तसेच अन्य कोणत्या रोगावर कोणती औषध मारायचे यांची एक शिफारस आहे. पण या सल्लागारांनी चुकीच्या शिफारशी केल्या त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.

तेल्या व मर रोग येण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र, चुकीचे मार्गदर्शन तेवढेच कारणीभूत आहे. हल्ली गावोगावी अनेक खते व औषध विक्री करणारी दुकाने सुरू झाली आहेत. त्यातील अभ्यास असणारे शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन करतात. पण आता टॉनिक विक्रीत नफा जास्त मिळतो. ऑरगॅनिक खते व औषधात नफा अधिक असतो. त्यामुळे अनेकदा बोगस खते विकून नफा मिळविणारे खूप वाढले आहेत.

बोगस औषधांचा सुळसुळाट झाला आहे. त्यात रसायने असतात. मात्र, ही रसायने पिकाचे शरीरशास्त्र बिघडवतात याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातून पिके वाचवताना नाकीनऊ येतात. एकूणच बोगस डॉक्टर हे शेतीत धोकादायक बनले आहेत. फेसबुक, व्हॉटसऍपच्या माध्यमातून काही सल्लागार तयार झाले आहेत. त्यातील काही ग्रुप हे तज्ज्ञांचे आहेत. पण काही फेक असतात. त्यापासून सावध राहण्याची गरज आहे. चांगल्या डॉक्टरकडे गेले की रुग्णाला आराम मिळतो. तसेच चांगल्या सल्लागाराचा सल्ला मोलाचा ठरतो. पण बोगस डॉक्टरांच्या वाट्याला न गेलेले बरे.

पालापाचोळा नष्ट करा

रोगग्रस्त फुले, रोगग्रस्त फांद्या, झाडावरील रोगग्रस्त फळे, पालापाचोळा जमा करुन नष्ट करावा. 100 लीटर पाण्यात दोन किलो ब्लिचींग पालडर मिसळून असे मिश्रण झाडाखाली जमीनीवर फवारावे. या नंतर 15 दिवसांनी 4% कॉपरडस्ट 8 किलो प्रती एकरी जमीनीवर धुराळणी करावी. कॅप्टन 25 ग्रँम + बॅक्टिनाशक 5 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कॉपर ऑक्सीक्लोराईड + 5 ग्रॅम बॅक्टिनाशक 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डॉ. बबनराव ईल्हे, शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, निफाड

कृषी सहाय्यकांचा सल्ला घ्या

कांदा, कापूस, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो या नगदी पिकांवर कीड व रोग जास्त येतात. अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी खते व संजीवके जास्त वापरतात. विविध रसायने वापरली जातात. त्यांच्या शिफारशी कृषी विद्यापीठे व विविध संशोधन संस्थानी केलेल्या आहेत. मात्र, अनेकदा अधिक उत्पादन घेण्याच्या नादात बोगस डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. गावोगावी कृषी सहाय्यक असतात. तसेच किसान वाहिनीवरून दूरध्वनी केला की शेतकऱ्यांना मोफत सल्ला मिळतो.

कृषी विद्यापीठे दैनंदिनी प्रकाशित करतात. त्यांचे संकेतस्थळ असते. दूरध्वनी क्रमांक दिलेले असतात. त्यावर दूरध्वनी केला की माहिती मिळू शकते. मात्र, गावोगाव येऊन सल्ला देणाऱ्या बोगस डॉक्टरच्या मार्केटिंगला अनेक जण बळी पडतात. शेतकऱ्यांनी वेळोवेळी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी अधीकारी, कृषी पर्यवेक्षक यांचा सल्ला घ्यावा. डाळींब लागवडीसाठी काळी जमीन न वापरता कोरडवाहू, मुरमाड पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीचा वापर करावा. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ञ, किटक शास्त्रज्ञ प्रत्यक्ष शेतावर येऊन शेतकऱ्यास मार्गदर्शन करतात.

अण्णासाहेब गागरे, तालुका कृषी अधिकारी, सिन्नर

- Advertisment -

ताज्या बातम्या