अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक असणार्या अवघड क्षेत्रातील शाळांची प्रारूप निवड यादी सोमवार (दि.21) जाहीर करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अवघड क्षेत्रातील निवडीची प्रक्रिया पूर्ण केली असून सव्वा महिन्यांच्या अभ्यासनंतर आणि जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू होताच आठ तालुक्यात 386 शाळा अवघड क्षेत्रातील घोषीत करण्यात आल्या आहेत. यात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नगर तालुक्यातील एकाही शाळा समावेश नूसन सर्व शाळा या सर्वसाधारण क्षेत्रात आहेत.
नक्षलग्रस्त अथवा पेसा गाव क्षेत्रात असणार्या प्राथमिक शाळा, वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2 हजार मिलीमीटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारी गावे, हिस्त्र वन्य प्राणी उपद्रव असणारा जंगल प्रदेश, वाहतूकीच्या सुविधांचा अभाव असणारे गावे, तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव, रस्त्याने न जोडलेल्या शाळा (बस, रेल्वे आणि अन्य सार्वजनिक वाहतूक), संवाद छायेचा प्रदेश (बीएसएनएलचा अहवालानूसार), डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाचा शासन निर्णय) राष्ट्रीय, राज्य मार्गापासून दहा किलो मीटर पेक्षा जास्त दूर असणार्या गावातील शाळांचा समावेश अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
या अटी पूर्ण करणार्या गावांची सार्वजनिक बांधकाम (राज्य सरकार) यांच्यासह वन्य विभाग, महसूल विभाग, बीएसएन विभाग यांच्याकडील अहवालानूसार यादी घेवून त्यांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून त्यात उपजिल्हाधिकारी निवडणूक, कार्यकारी अभियंता जि. प. बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग नियंत्रक एसटी विभाग आणि शिक्षणाधिकारी हे सदस्य होते. फेबु्रवारीत सुरू झालेल्या या प्रक्रियेला सोमवार (दि.21) रोजी मुहूर्त लाभला असून प्रशासनाने अवघड क्षेत्रातील 386 शाळांची प्रारूप घोषणा केली आहे. अवघड अथवा सर्वसाधारण क्षेत्रातील घोषित केलेल्या शाळांबाबत येत्या 25 मार्चपर्यंत या प्रारूप शाळांच्या नावावर आक्षेप अथवा सुचना करण्यास मुदत आहे. येणार्या सुचना आणि आक्षेप यावर सुनावणी होवून अंतिम शाळांची घोषणा करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय अवघड शाळा
राहुरी 8, जामखेड 2, पाथर्डी 2, पारनेर 16, शेवगाव 4, कर्जत 12, अकोले 273, श्रीगोंदा 11, संगमनेर 57, नेवासा 1 यांचा समावेश आहे.
अनेक ठिकाणी अवघड क्षेत्र असतांनाही त्यांचा समावेश अवघड शाळांच्या यादीत झाला नसल्याची तक्रारी शिक्षकांमधून होत आहेत. याबाबत शिक्षक संघटनाच्या माध्यमातून ते अवघड क्षेत्रातील शाळांबाबत आक्षेप नोंदविणार असल्याचे सांगण्यात आले. त्या आक्षेपावर जिल्हा परिषद प्रशासन काय निर्णय घेणार याकडे शिक्षकांचे लक्ष राहणार आहे.