नाशिक । प्रतिनिधी Nashik
ऑगस्ट महिन्यात वरुणराजाने जिल्ह्यावर कृपा केल्याने जिल्ह्यातील 24 धरणांत 86 टक्के इतका समाधानकारक जलसाठा आहे.
गतवर्षी हे प्रमाण 92 टक्के इतके होते. सद्यस्थितीत धरणांत 56 टीएमसी 458 दलघफू इतका जलसाठा आहे. आठ धरणे शंभर टक्के भरली असून ओव्हर फ्लो झाली आहे. चालू सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणे शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत.
जून व जुलै हा पावसाचा हंगाम कोरडा गेल्याने शहरासह जिल्हावासियांवर पाणीबाणीचे संकट निर्माण झाले होते. धरणांर जेमतेम 50 ते 60 टक्के जलसाठा होता. त्यामुळे नाशिककरांची सर्व अपेक्षा ऑगस्ट महिन्याकडून होती.
पावसानेही मागील दोन महिन्याची कसर भरुन काढत दमदार हजेरी लावली. मागील 15 ते 20 दिवसात चांगल्या पावसामुळे मोठी व मध्यम धरणे झपाट्याने भरली. दारणा व गंगापूर 96 टक्के भरली आहेत. त्यातून विसर्गामुळे जायकवाडीला विसर्ग सुरु होता.
जायकवाडी 65 टक्क्यांपेक्षा जादा भरले असल्याने यंदा गंगापूर धरणातून पाणी सोडणे बंधनकारक नसेल. सप्टेंबरच्या प्रारंभी जिल्ह्यात पाण्याची मुबलक उपलब्धी असल्याने सार्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांत आज उपलब्ध असलेला 86 टक्के साठा गत वर्षाच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी आहे. दरम्यान चालू महिन्यात देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला असल्याने धरणांतील जलसाठा गतवर्षीची पातळी गाठण्याची चिन्हे आहेत.
धरणनिहाय पाणीसाठा (टक्केवारित)
गंगापूर : 96
कश्यपी : 68
गौतमी गोदावरी : 80
आळंदी : 80
पालखेड : 89
करंजवण : 77
वाघाड : 82
ओझरखेड : 64
पुणेगाव : 90
तिसगाव : 29
दारणा : 97
भावली : 100
मुकणे : 83
वालदेवी : 100
कडवा : 100
नांदूरमध्यमेश्वर : 82
भोजापूर : 100
चणकापूर : 94
हरणबारी : 100
केळझर : 100
नागासाक्या : 100
गिरणा : 82
पुनद : 95
माणिकपुंज : 100