Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदर तीन महिन्यांनी होणार सरपंच सभा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

दर तीन महिन्यांनी होणार सरपंच सभा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्यात आता तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावातील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली.

- Advertisement -

ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याबाबत तक्रारी, निवेदने सरकारला प्राप्त होत असतात. याबाबी विचारात घेऊन राज्यात सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सरपंच सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सभेत संबंधित विस्तार अधिकारी (पंचायत) आणि इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी. ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी, गार्‍हाणी, अडचणींची सोडवणूक करावी. ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याच दिवशी या सभेचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी यांनी सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अहवाल एकत्र करून ते संबंधित विभागीय आयुक्त यांना सात दिवसात तर त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातून आलेले अनुपालन अहवाल शासनास दहा दिवसात सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्याचे मुश्रीफ म्हणाले

या अहवालाची सरकारच्या स्तरावर दखल घेण्यात येईल. सर्व जिल्ह्यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवून गावांमधील नागरी समस्यांची सोडवणूक करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्र्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या