नाशिक | प्रतिनिधी Nashik
संत निवृत्तीनाथ महाराजांची (Sant Nivruttinath Maharaj Palakhi) पालखी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत काल (दि १३) रोजी त्र्यंबकेश्वरमधून (Trimbakeshwar) नाशिकच्या सातपूरमध्ये (Nashik Satpur) दाखल झाली होती. पहिला मुक्काम झाल्यानंतर पालखीने आज सकाळी नाशिक शहराकडे कूच केली…..
(सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे)
रस्त्यावर सडा आणि रांगोळी काढत नाशिककरांनी पालखीचे पारंपारिक उत्साहात स्वागत केले. दुसरीकडे, वारकऱ्यांच्या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, पाऊले चालती पंढरीची वाट, विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची म्हणत वारकऱ्यांनी सातपूरपासून गणेशवाडी हे अंतर दुपारपर्यंत पार केले.
यानंतर पालखी गणेशवाडी येथे मुक्कामी आहे. उद्या पालखीचा तिसरा मुक्काम नाशिक सिन्नर रस्त्यावरील पळसे याठिकाणी होणार असून पुढे पालखी सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी मार्गे नगर जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे.
आज सकाळी पालखी येणार असल्याची वार्ता पसरताच अशोकस्तंभ ते रविवार कारंजा मार्गावर (Ashokstambh to Ravivar Karanja road) रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मोठ्या संख्येने नाशिककरांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
पोलीस अधिकारी (Police Officer) आणि कर्मचाऱ्यांनी याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त (Police Deployment) पाळलेला होता. अनुचित वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळपासुनच पालखी मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती.
रस्त्यावर वारीतील महिलांनी फुगडी खेळत उपस्थितांचे लक्ष वेधले. तर बालकांनादेखील विठुरायाच्या वेशभूषेत याठिकाणी अनेक महिलांनी आणलेले होते. त्यांचे ते रूप पाहून अनेकांनी लहानग्या विठूरायांचे कौतुक केले. करोनामुळे दोन वर्ष वारी होऊ शकली नव्हती त्यामुळे नाशिकरांना पालखीचे दोन वर्षे दर्शन झालेले नव्हते. मात्र, आज पालखीच्या दर्शनासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी दर्शनासाठी केलेली होती.