Thursday, April 25, 2024
Homeनगरआ. डॉ. तांबे यांच्या पाठपुराव्यातून विनाअनुदानित शिक्षकांना वेतन

आ. डॉ. तांबे यांच्या पाठपुराव्यातून विनाअनुदानित शिक्षकांना वेतन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अघोषित, अंशत: विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना वेतन मिळावे

- Advertisement -

यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून मोठे यश मिळाले असून राज्य सरकारने हा निधी तातडीने मंजूर केला असल्याने या विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना वेतन मिळणार असल्याचे आ. डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.

मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार,शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडी सरकारने हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. डॉ. तांबे यांच्यासह शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ना. वर्षाताई गायकवाड यांचा सत्कार केला.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, अंशत: विनाअनुदानित शाळांचा प्रश्न मिटावा यासाठी मागील 47 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षक संघटनांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या सुरुवातीपासून आ. डॉ. तांबे या प्रश्नांसाठी ठाण मांडून होते. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्यामार्फत त्यांनी सातत्याने सरकारकडे या प्रश्नांसाठी निधीची मागणी केली.

यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही पुरवणी मागणी मंजूर झाली. परंतु शासनाने हा निधी वितरीत करण्याचा अध्यादेश काढला नव्हता. त्यावर आ. डॉ. तांबे यांनी शालेय शिक्षण व वित्त विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून आज विनाअनुदानित शाळांना 20 टक्के व ज्या शाळांना 20 टक्के अनुदान आहे त्यांना वाढीव 20 टक्के म्हणजे 40 टक्के चा निधी वितरीत करण्याचा अध्यादेश मंजूर करून घेतला.

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले की, शिक्षण व्यवस्था ही समाज बदलण्याचे प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण भागात, आदिवासी भागात, वाडीवस्तीवर अनेक शिक्षक वर्षानुवर्षे विनावेतन काम करत आहेत. त्यांची मागणी रास्त आहे. या निर्णयामुळे 66 हजार शिक्षकांसमवेत त्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही त्यामुळे गुणवत्तेचा फायदा होणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने नामदार उध्दव ठाकरे, नामदार अजित पवार, नामदार बाळासाहेब थोरात, नामदार वर्षाताई गायकवाड यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. यापुढेही अघोषित शाळांचा प्रश्न, पायाभूत वाढीव पदांचा प्रश्न सोडविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून हे सरकार सर्वसामान्यांसाठी चांगले निर्णय घेत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

आ. डॉ. तांबे यांच्या या पाठपुराव्याबद्दल राज्यासह, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमधील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर संघटनांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या