कोपरगाव (प्रतिनिधी)
तालुक्यासह देशभरात करोना साथ अडीच वर्ष ठाण मांडून होती. या अडचणीच्या काळात विविध विभागाचे अतिरिक्त वाहन वापरण्यात येऊन त्यावर चालक नेमून त्यांना वाहन चालक मानधनाचे गाजर दाखवून काम करून घेतले.
मात्र सदर चालकांना अद्याप वाहन चालक मानधन दिले नाही. हा आपल्यावर अन्याय असून सदर मानधन सरकारने त्वरित द्यावे, अशी मागणी सुनील शिवाजीराव गायकवाड व अंकुश चांगदेव आहेर यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांचेकडे केली आहे.
त्यांनी म्हटले आहे, सन 2020 साली करोनाची साथ देशात आली होती. त्यावेळी हा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. आरोग्य विभागाची वाहने कमी पडली होती. त्यावेळी अन्य शासकीय वाहने सरकारने ताब्यात घेऊन अधिग्रहण केली होती. व ती वाहने गस्तीसाठी वापरली होती. त्यासाठी नियमित वाहन चालक आजारी असल्याने व ते कर्तव्यावर नसल्याने सरकारने खाजगी वाहन चालकांना मानधनावर नेमले होते. त्यांना अद्याप मानधन दिले नाही.
चालक सुनील गायकवाड यांनी वनविभागाचे वाहन क्रं.एम.एच.15 एफ.वाय.2563 यावर दि.24 मार्च 2020 ते 15 एप्रिल 2020 या कालावधीत तर दुसरे चालक अंकुश आहेर यांनी दि. 16 एप्रिल पासून पुढे चालक म्हणून काम केले होते. त्यामुळे सदरचे मानधन तहसीलदार यांनी देणे गरजेचे होते. मात्र अडीच वर्षानंतर गायकवाड व आहेर आदींना ते अद्याप मिळाले नाही.