साकुरीच्या प्रभाग 2 मधील नागरिकांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

jalgaon-digital
2 Min Read

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

साकुरी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु वॉर्ड क्रमांक 2 मधील नगरिकांच्या समस्या मागील 5 वर्षांत न सोडविल्यामुळे या वॉर्ड मधील दंडवते वस्तीवरील नागरिकांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

तसे पत्र त्या भागातील नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामपंचायत व संबंधितांना पाठविले आहे. गोदावरी वसाहत ते दंडवते वस्तीवर जोडणार्‍या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. या रस्त्याचे कुठलेही काम मागील पाच वर्षांत झालेले नाही.

सदरील पालकमंत्री पाणंद रस्ता करण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे. हा अधिकार असताना सुद्धा रस्त्याचे काम मागील पाच वर्षात पूर्ण झाले नाही. याबाबत वेळोवेळी तहसीलदार, ग्रामपंचायत, प्रांत कार्यालय यांना निवेदन देऊन सुद्धा काम झालेले नाही. त्यामुळे येथील रहिवाशी असलेल्या दोनशे ते तीनशे नागरिक यांची गैरसोय होत आहे.

रस्ता नसल्यामुळे शेतात जाणे-येणे, दुधाची ने-आण करणे, मुलांना शाळेत घेऊन जाणे या सारख्या विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी निवेदने देऊनही रस्ता न झाल्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर दीपक बापुराव दंडवते, प्रकाश बापुराव दंडवते, हिराबाई बापुराव दंडवते, शारदा प्रकाश दंडवते, अनिता दीपक दंडवते, ॠषीकेश प्रकाश दंडवते, शांताराम नामदेव बावके, यमुना शांताराम बावके, विजया शांताराम बावके, अविनाश शांताराम बावके, ॠतुजा अविनाश बावके आदींच्या सह्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *