शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्या श्री साईबाबांच्या पावन भूमी शिर्डी शहरात साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अक्षय तृतीयेला आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला यंदा 21 वर्षे पूर्ण झाले असून आजपर्यंत सुमारे 2 हजार मुलींचे कन्यादान केले आहे. यावर्षी 21 नवदाम्पत्य जोडपे साधूसंताच्या आशिर्वादाने विवाहबद्ध झाले.
प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2002 साली सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा सुरू करण्यात आला असून आज या विवाह सोहळ्याला 21 वर्षे पूर्ण होत आहे. आजपर्यंत 21 वर्षात फक्त सव्वा रुपयांत 2 हजार विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाले आहे.
या अभुतपुर्व विवाहसोहळ्याची ख्याती महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहचली आहे. तसेच या सोहळ्याची वर्ल्ड बुक ऑफ लंडनमध्ये नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी 2022 मध्ये 21 नवदाम्पत्य जोडप्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये 2 जोडप्यांचा विवाह बौद्ध धर्म पद्धतीने तर 19 विवाह हिंदू धर्म पध्दतीने लावण्यात आले.
यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी नगराध्यक्षा सुमित्राताई कोते, प्रभाकर कोते, साईनिर्माणचे विजय कोते, नितीन कोते, दादासाहेब गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, ताराचंद कोते, हरिश्चंद्र कोते, अरविंद कोते, राजेंद्र कोते, गोपीनाथ गोंदकर, दत्तात्रय कोते, दिनकर कोते, उत्तम कोते, मंगेश त्रिभुवन, सलीमभाई शेख, रहिमबाबा पठाण, गफ्फारखान पठाण, समीर शेख, अॅड. अविनाश शेजवळ, धनराज कोते, अभिजित कोते, राम कोते, देवानंद शेजवळ, अजय नागरे, विकास गोंदकर, गणेश कोते, विरेश चौधरी, फकिरा लोढा, शफीकभाई शेख आदी मान्यवरांसह वर्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळू महाराज यांनी उपस्थित नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले. विवाहसोहळ्याचे आयोजक साईसिध्दी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कैलासबापू कोते यांनी सर्वधर्मीय विवाहसोहळ्याची माहिती दिली. श्री साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या विवाह सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व वरांची घोड्यावरून श्री साईबाबांचे दर्शन करून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी वधूवरांना संसारपयोगी वस्तू तसेच वधूला पैठणी साडी तर वर मुलांंना सलवार कुर्ता याबरोबरच सोन्याचे मनिमंगळसुत्र देण्यात आले. आलेल्या सर्व वर्हाडी मंडळींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
बुधवार दि. 4 रोजी शिर्डी शहरातील साई किमया गार्डन येथे पार पडलेल्या सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रथम 2 विवाह बौद्ध धर्म पध्दतीने श्री निकम आणी श्री गोडगे यांनी मंत्रोच्चार म्हणून पार पाडले. त्यानंतर उर्वरित 19 जोडप्यांचे विवाह हिंदू धर्म पध्दतीने पार पडले असून याचे पौराहित्य श्री लावर गुरुजी यांनी केले. यामध्ये राजस्थान येथील एक जोडपे विवाहबद्ध झाले. वधूवरांना कैलासबापू कोते आणी सुमित्राताई कोते यांच्या हस्ते कन्यादान करण्यात आले. प्रास्ताविक हरिश्चंद्र कोते यांनी केले. वधू-वरांना श्री साईचरीत्र ग्रंथ तसेच सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक बावचे यांच्यावतीने गेली 21 वर्षापासून साईप्रतिमा देण्यात आली. आभार अॅड. बाळासाहेब कोते यांनी मानले.