20 जानेवारीला अंतिम होणार रोहयोचा वार्षिक आराखडा

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून समृध्दी लेबर बजेट तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. यात गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या प्रक्रिया राबविण्यात येत असून रोजगार हमी योजनेत आता शरद पवार ग्राम समृध्दी योजना राज्यात लागू केली आहे. यात ग्रामीण भागातील युवकांना, मजुरांना व शेतकरी कुटूंबांना शेतीपूरक जोड व्यवसाय करता येणार आहे. दरम्यान, 20 जानेवारीला रोजगार हमीचे वार्षिक लेबर बजेट 20 जानेवारी 2022 ला जिल्हा पातळीवर अंतिम होणार आहे.

रोजगार हमीचे समृध्द लेबर बजेट नियोजन व वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी 7 सप्टेंबरपासून गाव पातळीवरून शिवार फेरी काढून जलसंधारणाची कामांचे निरिक्षण करून त्यानूसार रोहयोत कामे घेण्यात येणार आहेत. त्यानंतर गाव,वाडी, तांडा फेरी, ग्रामपंचायत पातळीवर अधिकार्‍यांची बैठक, कुटूंब समृध्दीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरपासून ग्रामपंचायत पातळीवर कामांची प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर 2 तारखेला समृध्द ग्रामसभा, त्यानंतर प्रारूप यादीवर आक्षेप, ग्रामपंचायत पातळीवर लेबर बजेट तयार होवून तालुका पातळीवर संपूर्ण तालुक्याचे लेबर बजेट तयार करण्यात येणार आहे.

20 डिसेंबरपर्यंत सर्व तालुक्यांचे लेबर बजेट तयार होवून ते जिल्हा पातळीवर जाणार असून त्याठिकाणी महिनाभरात ते अंतिम होवून 20 जानेवारीला जिल्हा परिषदे स्तरावर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 31 जानेवारीला रोजगार हमी आयुक्तांकडे ते मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. आता रोजगार हमीमध्ये गाव हा केंद्रबिंदू न मानता कुटूंब हा केंद्रबिंदू मानण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद व अन्य शासकीय यंत्रणांची जबाबदारी वाढली असून ग्रामीण भागातील गरीब कुटूंबाला दारिद्र रेषेच्यावर आण्यासाठी रोहयातून प्रयत्न करण्यात येणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *