नगरमधील रस्ते घोटाळाप्रकरणी आत्मदहनाचा इशारा

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रस्ते घोटाळाप्रकरणात बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्टच्या आधारे मनपात सुमारे 200 कोटींच्या कामात भ्रष्टाचार करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे काँग्रेसने केली होती. काँग्रेसने 15 दिवसांचा दिलेला अल्टीमेटम संपला आहे. मात्र, हे प्रकरण तीन आठवड्यांपूर्वी चव्हाट्यावर येऊन देखील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यामुळे अखेर शहर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचे जाहीर केले आहे.

स्व राज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची तिथी प्रमाणे 1 जून रोजी जयंती आहे. या दिवशी आत्मदहन करण्याचा शहर काँग्रेस पदाधिकार्‍यांनी दिला आहे. तसे पत्र मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन काँग्रेस शिष्टमंडळाने चर्चा केली आहे. यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाल, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते आदी उपस्थित होते.

नगर शहरात बनावट रिपोर्टची पडताळणी करणे हे चार-पाच दिवसांचे काम आहे. काँग्रेसने नागरिकांच्यावतीने सुमारे तीन आठवडे वाट पाहिली. अनेक आंदोलने केली. शहराचे आमदार, नगरसेवकांना जनतेला खड्ड्यात घालणार्‍या दोषींवर कारवाई करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. मात्र लोकप्रतिनिधी, ठेकेदार, अधिकारी यांच्या संगनमतातून हा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात अनेकांचे हात बरबटले आहेत. दोषींवर कारवाई करण्याऐवजी रात्रीच्या अंधारात अर्थपूर्ण तडजोडी सुरू आहेत.

मनपा आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना चौकशी अधिकारी नेमल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात अतिरिक्त आयुक्त पठारे रजेवर होते. त्या काळात उपायुक्त यशवंत डांगेंकडे पदभार होता. त्यांनी काडीचाही तपास केला नाही. शासकीय तंत्रनिकेतनने माहिती मागवून देखील जाणीवपूर्वक दिली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *