Friday, May 10, 2024
Homeनगररात्री 10 नंतर फिरण्यास 31 मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध

रात्री 10 नंतर फिरण्यास 31 मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाल्याने पूर्वी प्रमाणे जिल्हा प्रशासनाने गर्दीची ठिकाणे, कार्यालये, धार्मिक स्थळे, सिनेमागृह, हॉटेलसाठी वेगवेगळे निर्बंध लागू केले आहेत.

- Advertisement -

यात प्रामुख्याने रात्री दहा ते पहाटे पाच या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यक्तींच्या फिरण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यासह आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व कार्यालयांत 50 टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मान्यतेने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी हे आदेश काढले आहेत. हे आदेश 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोनाचा प्रकोप वाढण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे तातडीने सर्व उपाययोजना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचाच भाग म्हणून बुधवारी (दि.17) रात्री 12 पासून 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत रात्री 10 ते पहाटे पाच या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वांच्या फिरवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

यासह पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावरही बंदी लावण्यात आली आहे. सर्व सिनेमागृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट याठिकाणी करोना नियमांचे पालन करून 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहेत. सर्व शॉपिंग मॉल्समध्ये मास्क, सॅनिटायझर, तापमान मोजणी, सामाजिक अंतराचे पालन करण्यास सुचित केले आहे. अन्यथा दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

यासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यावर बंदी लावण्यात आली आहे. विवाह समारंभासाठी 50 तर अत्यंविधीसाठी 20 लोकांची मर्यादा आखून देण्यात आलेली आहे. आरोग्य आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयांत 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात यावी, करोना नियमांचे उल्लंघन केल्यास केंद्र सरकारच्या साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार आपत्ती जाहीर केलेल्या तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येईल, धार्मिक स्थळे आणि ट्रस्ट यांनी गर्दी आणि सामाजिक अंतराचे नियमन करावे, एका तासात किती लोकांना दर्शन देणार याचे नियोजन करावे, ऑनलाईन आरक्षणाची सुविधा द्यावी, शाळा महाविद्यालयात मास्कशिवाय प्रवेश बंद करावा, विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 50 लोकांच्या उपस्थितीत अथवा ऑनलाईन पध्दतीने घ्याव्यात, आदी निर्बंधाचा यात समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या