Thursday, April 25, 2024
Homeनाशिकरासाकाची पाती फिरली

रासाकाची पाती फिरली

निफाड | निफाडनामा |आनंदा जाधव Niphad

अजित पवारांनी (ajit pawar) दिलेला शब्द जनतेने पाळत दिलीप बनकरांना (dilip bankar) आमदारकी बहाल केली तर बनकरांनीही रासाका (RASAKA) चालू करीत दिलेले आश्वासन पाळले. साहजिकच रासाकाचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी आलेले जाणते राजे शरद पवार (sharad pawar) यांनी निसाका (NISAKA) प्रश्नाला देखील हात घालत तुम्ही वेळ काढून या.

- Advertisement -

यावर काहितरी मार्ग काढू असे आश्वासन जनतेला दिले. अजित पवारांच्या माध्यमातून बंद पडलेल्या रासाकाचे शिवधनुष्य बनकरांनी पेलले. आता थोरल्या पवारांकडून निसाकाचा शब्द मिळाल्याने गत 9 वर्षांपासून बंद पडलेला निसाका चालू करण्याबाबत ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकरी (farmers), कामगार व व्यवसायिकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

तालुक्यात कर्मविर काकासाहेब वाघ (Karmavir Kakasaheb Wagh) यांनी रासाका व निसाकारुपी साखर कारखान्यांची (Sugar factories) मुहूर्तमेढ रोवली अन् तालुक्यात साखर उद्योग बहरला. निसाकाच्या बाबतीत बोलायचे झाले तर 35 हजार सभासद, 800 कायम कामगार तर 600 हंगामी कामगार. तसेच हंगामात प्रतिटन 7000 मे. टन ऊसाचे गाळप करणारा हा कारखाना सन 2012 मध्ये अवघे 90 हजार मे. टन ऊस गाळप करीत बंद पडला.

त्यावेळी निसाकाला 180 कोटींचे देणे होते तर कारखान्याकडे 80 कोटींची साखर शिल्लक होती. म्हणजे या कारखान्यावर अवघे 100 कोटींचे कर्ज होते. मात्र त्याच वर्षी या कारखान्याची निवडणूक (election) होणार होती. त्यामुळे निवडणुकीपेक्षा हा कारखाना भाडेतत्वावर कुणाला तरी चालविण्यास द्यावा असा विचार पुढे आला. निसाकाप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी कारखाना अवसायनात काढणे गरजेचे होते.

साहजिकच त्यासाठी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके संचालक वगळता इतरांनी राजीनामे (Resignation) दिले. तत्पुर्वी कारखाना जनरल मिटींगमध्ये कारखाना भाडेतत्वावर चालविण्याचा ठराव करण्यात आला. मात्र हा ठराव प्रत्यक्ष कागदावर उतरू शकला नाही. राजकारणाच्या साठमारीत नंतर जे कारखाना चालवू शकत नाही त्यांना भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला गेला.

परिणामी या काळात कामगारांचे पगार (Workers’ salaries), बँकेचे कर्जावरील व्याज वाढत जावून निसाकावर 350 कोटींंचा डोंगर उभा ठाकला. नंतर ड्रायपोर्टचा (Dryport) प्रस्ताव पुढे आला. त्यात चार वर्ष गेली. नंतर माशी कुठे शिंकली कळले नाही. विद्यमान आमदार दिलीप बनकरांनी (mla dilip bankar) देखील निसाका भाडेपट्टयावर घेण्यासाठी चार वेळा प्रयत्न केले. मात्र पुढे काय झाले हे अवघा तालुका जाणून आहे.

‘झाले गेले गंगेला मिळाले’ अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्तेत आली अन् रासाकाची निविदा प्रसिद्ध झाली. दिलीप बनकरांनी पतसंस्थेच्या माध्यमातून निविदा भरली अन् जाणते राजे यांनी लक्ष घालत ती मंजूर करवून घेतली. आज रासाकाचा गाळप हंगाम सुरू झाला असून परिसर पुन्हा कामगार, व्यवसायिकांनी बहरला आहे.

याच कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभाप्रसंगी शरद पवार व छगन भुजबळ (chagan bhujbal) यांनी दिलीप बनकरांवर स्तुतीसुमने उधळत आगामी निवडणुकीत बाजार समिती (Market Committee) पुन्हा बनकरांकडे देण्याचे सूतोवाच करीत पायात पाय न घालण्याचा वडीलकीचा सल्ला दिला. त्यावेळी बंद पडलेला निसाका चालू करण्याचा मनोदय शरद पवारांनी बोलून दाखवत त्यासाठी येथल्या प्रमुख लोकांनी वेळ काढुन येण्याचा सल्ला दिला.

कारखान्याची मशिनरी दुरुस्ती करणारी वसंतदादा शुगर इन्स्टट्यूट लि. (Sugar Institute Ltd.) चे मी चेअरमन आहे. त्यामुळे तिची पाहणी करण्यासाठी अधिकारी पाठवू असा सल्लाही पवारांनी दिला. बंद पडलेला रासाका पवारांच्या माध्यमातून सुरू झाल्याने निसाका देखील पवार सुरू करू शकतील ही अपेक्षा शेतकर्‍यांच्या मनात बळावली असून निसाका सुरू झाला तर तालुक्याला गतवैभव मिळून विकासाला नवी दिशा मिळू शकेल.

मात्र त्यासाठी शेतकर्‍यांनी कमी पाण्यात ऊसाचे दर्जेदार उत्पन्न घेणे गरजेचे आहे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. आजच्या परिस्थितीत तालुक्यात तीन साखर कारखाने असून यापैकी रासाका नुकताच चालू झाला आहे. याव्यतिरिक्त अनेक गुर्‍हाळे देखील कार्यान्वित झाली आहे. गोदाकाठ भागात ऊसाचे सर्वाधिक क्षेत्र असून या परिसरातील ऊस बाहेरील कारखान्यांना तोडून देण्यासाठी पैसे मोजावे लागत होते.

रासाका सुरू झाल्याने शेतकर्‍यांना आपला हक्काचा कारखाना मिळाला आहे. त्यामुळे ऊस तोडणीसाठी करावी लागणारी यातायात थांबणार आहे. रासाका प्रमाणेच निसाका सुरू व्हावा ही गेल्या 9 वर्षापासून कामगार व ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मागणी आहे. मात्र त्याला यश येतांना दिसत नाही. मात्र आता जाणते राजे शरद पवार यांनी निसाका प्रश्नी भावनिक साद घातल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

साहजिकच निसाका सुरू करावयाचा झाल्यास 400 कोटींचे कर्ज फेडण्याची हमी, मशिनरीची दुरुस्ती प्रथम करणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही कारखान्यांना पुरेल एवढा ऊस तालुक्यात असणे गरजेचे आहे. कारण निसाकाची गाळप क्षमता सर्वाधिक आहे. त्या तुलनेने ऊस पुरवठा होणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांनी ऊस पुरवठ्याची तयारी दर्शविली अन् जाणते राजे शरद पवारांनी लक्ष घातले तर निसाका चालू होणे अवघड गोष्ट नाही. एकूणच रासाका गाळप हंगामाच्या निमित्ताने निसाका प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून आता तालुक्यातील नेते, लोकप्रतिनिधी निसाका प्रश्नी पुढे काय भूमिका घेतात हे पाहणे उचित ठरणार आहे.

निसाका, रासाका तुलनात्मक दृष्टीकोन

बंद पडलेला रासाका सुरक्षित ठेवण्यात कर्मचार्‍यांनी मोलाची भूमिका बजावत हा कारखाना चालू झाला पाहिजे यासाठी कामगारांनी वेळोवेळी प्रयत्न केले. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या, उपोषण केली. परिणामी रासाकाची निविदा काढणे शासनाला भाग पडले. तर निसाकात सुरू झालेले चोरीचे सत्र अन् त्याकडे कामगारांनी केलेला कानाडोळा.

चोरीची पोलीस दप्तरी नसलेली नोंद. यामुळे कारखान्यात किती मशिनरी चोरीला गेली अन् काय शिल्लक राहिले याबाबत सभासद अनभिज्ञ असल्याने निसाकाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. त्यातच निसाकावर वाढते कर्ज व सर्वाधिक गाळप क्षमता यामुळे निसाकाचा प्रश्न जटील बनला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या