देवळा । प्रतिनिधी Devla
तालुक्याच्या पुर्व भागासाठी संजीवनी ठरलेले किशोर सागर ‘रामेश्वर’ धरण अखेर ओव्हरफ्लो झाले आहे.
सांडव्यावरून खाली कोसळत असलेल्या पाण्यामुळे कोलथी नदी देखील प्रवाहीत झाली आहे. कोलथी, भावडी या नद्या दुथडी वाहू लागल्याने शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील पुर्व भागातील शेतकरी व ग्रामस्थांचे रामेश्वर धरणाकडे लक्ष लागले होते. मात्र पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरण तुडूंब भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यंदा देवळा तालुक्यात प्रारंभी दमदार पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा आदी पिकांवर होवू लागला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.
तसेच चणकापूर उजव्या कालव्याला देखील पाटबंधारे विभागातर्फे पाणी सोडण्यात आल्याने धरण भरण्यासह कालवे देखील पुर्ण क्षमतेने प्रवाहीत झाले आहेत. कोलथी, भावडी या नद्यांसह परिसरातील नाले देखील पावसामुळे पुर्ण क्षमतेने वाहत आहे. याचा लाभ सिंचनास मिळणार असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.