पावसाचे पुन्हा संकट

jalgaon-digital
1 Min Read

पुणे, अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात पुन्हा पावसाचे संकट उभे राहिले आहे.

अगोदरच सातत्याने पडणार्‍या पावसाने सोयाबीन, बाजरी, कपाशीसह अन्य पिकांचे तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच, वेधशाळेच्या या अंदाजामुळे शेतकर्‍यांची धाकधूक वाढली आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 20, 21 आणि 22 ऑक्टोबरला राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. नगर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी होत असल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई त्वरीत देण्याची मागणी होत आहे.

भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस

भंडारदरा पाणलोटात गत दोन तीन दिवसांत अधून मधून पाऊस सुरू होता. पण काल रविवारी रात्री 9.30 वाजेपासून जोरदार सरी कोसळत होत्या. उशीरापर्यंत पाऊस सुरू असल्याने भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने पाणी प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडे धरणही भरले असल्याने प्रवरा नदीचे पाणी वाढण्याची शक्यता असल्याचे भंडारदरा वार्ताहराने कळविले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *