राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयातील लॅब कर्मचार्‍यांअभावी बंद

jalgaon-digital
2 Min Read

राहुरी |तालुका प्रतिनिधी| rahuri

नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयातील लॅबरेटरी विभाग कर्मचार्‍यांविना बंद असल्याने

नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत त्वरित निर्णय घेऊन संबंधित विभागाचे कार्य सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांच्यासह राहुरीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.

याबाबत माहिती देताना बोरकर म्हणाले, आज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तसेच लवकर चाचण्या झाल्यास विलगीकरण व उपचार वेळेवर होऊन रोगाचा फैलाव कमी होऊ शकतो. मागील वर्षात राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयातील लॅबरेटरी विभागा तील कर्मचार्‍यांनी अतिशय चांगले काम करून जास्तीत जास्त तपासण्या होऊन करोना रुग्णांना दिलासा दिला. रुग्णांना वेळेवर विलगीकरण व उपचार मिळाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राहुरी तालुक्यात चांगले राहिले.

परंतु आज ग्रामीण रुग्णालयात पाहणी केली असता संबंधित लॅबरेटरी विभागात कर्मचार्‍यांअभावी बंद असल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी केली असता येथील दोन्ही कर्मचारी नगर जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या बदली म्हणून नेमणूक झाल्याचे समजते.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत राहुरीचे दोन्ही कर्मचारी संबंधित विभागात सेवेसाठी उपलब्ध करून देऊन राहुरी व तालुक्यातील नागरिकांना करोना चाचणीसाठी त्वरित सेवा मिळण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी बोरकर व त्यांच्या सहकार्‍यांनी केली असून अन्यथा ग्रामीण रुग्णालयाला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही याबाबत त्वरित माहिती देणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *