श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrirampur
अडचणी आणि संघर्षातून कुंडलिकराव जगताप (तात्या) यांनी कुकडी कारखान्याची उभारणी केली.
कुकडी पट्ट्यातील शेतकर्यांना हक्काचा कारखाना देण्यासाठी त्यांनी कसलीही पर्वा केली नाही. शेतकरी सुखाचे त्यांनी पाहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करीत आहोत. त्यामुळे यंदाचा हंगाम ताकदीनिशी करू, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केला.
कर्मयोगी कुंडलीकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या मशीनरीचे गुरुवारी कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. राहुल जगताप व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सामाजीक कार्यकर्ते विलासराव दिवटे व संचालक मंडळ यांच्याहस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
गळीत हंगाम 2020-2021 ला सामोरे जात असताना कारखाना संचालक मंडळाने 9.00 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे मशिनरी व सहवीज निर्मिती प्रकल्पाचे ओव्हरऑईलिंगची कामे पूर्ण होत आलेली आहेत. त्याचबरोबर ऊसतोडणी व वाहतुकदारांचे करार पूर्ण करून हप्ते वाटपही देण्यात आले आहे.
याप्रसंगी अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले, येणारा गळीत हंगाम करोना पार्श्वभूमीवर अत्यंत आव्हानात्मक आहे. येणार्या सर्व अडचणींवर मात करून कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करणार असून 9 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. तसेच या हंगामात सहवीज निर्मिती प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने चालविणार आहे.
मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती व उसाअभावी तालुक्यातील सर्वच कारखाने बंद राहिले होते. परंतु परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड कारखान्याच्या कार्यक्षेत्रात व तालुक्यात झालेली असल्याने या हंगामामध्ये 22 लाख मे. टनाच्या आसपास ऊस उपलब्ध होणार आहे.
साखर उद्योग मागील 4 ते 5 वर्षांपासून आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. यावर्षी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने एफआरपीमध्ये 100 रुपये वाढ झालेली असल्याने खर्च आणि उत्पन्न यांच्यामध्ये 300 ते 400 रुपयांच्या आसपास तफावत पडत आहे. ही तफावत दूर करावयाची असल्यास केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत रुपये 31 रुपयांवरून 36 करणे गरजेचे आहे.
कारण मागील 10 वर्षांमध्ये एफआरपीमध्ये दुपटीने वाढ झाली परंतु साखरेचे दर वाढले नसल्याने बहुतेक कारखान्यांना मोठा तोटा सहन करून, कर्ज काढून एफआरपी द्यावी लागली. त्यामुळे केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करून कारखान्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी साखरेला आधारभूत किंमतीत कमीत कमी 36 रुपये द्यावी, अशी मागणी माजी आ. राहुल जगताप यांनी केली.
कारखान्याला 60 केएलपीडीचे लायसन मिळाले असून, येणार्या काळामध्ये लवकरच इथेनॉल प्लँटची उभारणी करणार आहोत. त्यामुळे भविष्यात शेतकर्यांना जादा भाव देण्यास मदत होईल. कारखान्यातील कर्मचार्यांची महागाई भत्त्यानुसार पगारात रु. 2700.00 प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे.
यावर्षी करोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर साखर कारखानदारीला झटका बसला असून येणार्या गळीत हंगामामध्ये ऊसतोडणी व वाहतुकदार तसेच कामगार, शेतकरी यांची कारखाना साईटवर आरोग्याची काळजी घेण्यात येणार असून त्यादृष्टीने कारखाना तयारी करत असून दैनंदिन जिवनामध्ये प्रत्येकानेच तोंडाला मास्क वापरणे सामाजिक अंतराचे पालन करणे तसेच स्वतः बरोबर दुसर्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब उगले, विश्वास थोरात, ज्येष्ठ संचालक विवेक पवार, अंकुश रोडे, प्रल्हाद इथापे, कचरु मोरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड, कामगार संघटनेचे अध्यक्ष कल्याण जगताप, प्रॉडक्शन व्यवस्थापक अनिल कुमार, मुख्य अभियंता भास्करराव काकडे तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.