राहाता (तालुका प्रतिनिधी) –
पंधरा वर्षापासून शेकडो बळी घेणार्या नगर कोपरगाव महामार्गाचे काम याही वर्षी रखडले. केवळ कोट्यावधी निधीच्या घोषणा सरकारी बाबूंच्या लेट लतीफ कारभारामुळे लालफीतीतच अडकल्याने तालुक्यातील नागरिक शिर्डीला
येणारे लाखो साईभक्तांचा जिव टांगणीला. तर शेतकर्यांच्या जिवनाचा प्रश्न ठरलेल्या गोदावरी कालव्यांचे रखडलेले नुतणीकरण हे एैरणीचे मुद्दे मावळत्या वर्षीत प्रलंबीतच राहीले आहे.
गेल्या वर्षातील दहा महिने करोनाच्या सावटाने नागरिक हैराण झाले. तालुक्याची आर्थिक घडी कोलमडून पडली. तालुक्याची नंबर एकची बाजारपेठ ओस पडली तर साई मंदिर बंद राहिल्याने शिर्डीतील व्यावसाईक कर्जाच्या बोजाखाली दबले गेल्याने या आर्थिक आरिष्ठात सापडलेल्या शिर्डीकरांना मावळते वर्ष मोठे कठीण गेले असून नुतन वर्षाची आतुरतेने वाट पाहात आहे.
साई मंदिर बंद राहिल्याने हजारो कर्मचार्यांना घरी बसण्याची वेळ आली होती. अर्ध्या पगारावर त्यांनी संसाराचा गाडा हकला. करोना काळात शिर्डीच्या इतिहासात प्रथमच रामनवमी उत्सव व गुरूपौर्णिमा उत्सव साईभक्तांविना साजरे करावे लागले. याच वर्षात शिर्डी संस्थानचे आर्थीक उत्पन्न घटल्याने तिजोरीत खडखडाट झाला. कर्मचार्यांचे पगार करतानाही संस्थानला तारेवरची कसरत करावी लागली. करोना कहर कमी झाल्याने साई मंदिर सुरू झाल्याने शिर्डी काही प्रमाणात सुरू होऊन व्यावसाईकांना दिलासा मिळू लागला आहे. मात्र पुर्वीचे दिवस यायला येणार्या नव्या वर्षाची वाट पहावी लागणार आहे.
गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून तालुक्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेला नगर कोपरगाव महामार्गाची मोठी दुर्दशा झाली. शेकडो जणांचे बळी जाऊनही दर्जेदार काम झाले नाही. खड्डे व ते बुजविण्यासाठी वापरलेल्या मुरूम मातीने या महामार्गावर सध्या धुळवडीमुळे स्थानिक नागरिक, प्रवाशी व साईभक्त मेटाकुटीस आले. आतापर्यंत महामार्गासाठी कोटीच्या कोटी रूपयांच्या घोषणा झाल्या. काही निधी आलाही. पण रस्ता दुरूस्त झालाच नाही. आताही मोठ्या निधी व दर्जेदार रस्त्याची घोषणा मंत्री व लोकप्रतिनिधी तसेच सरकारी बाबूंनी केली मात्र या मार्गाचे भाग्य कधी उजळणार? हे परमेश्वरच जाणो.
तालुक्यातील शेतकर्यांच्या दृष्टीने जिवन मरणाचा प्रश्न म्हणजे गोदावरी कालव्यांचे पाणी. शेकडो वर्षा पुर्वीची पाणी वितरण करणारे हे कालवे शेवटच्या घटका मोजत असून सरत्या वर्षी शेतकर्यांनी हा प्रश्न लावून धरला. चळवळ उभी राहीली. काही प्रमाणात लोकवर्गणीही जमा झाली. यावर्षी काम नक्की पुर्ण होईल असे प्रत्येक शेतकर्याला वाटले मात्र पुन्हा हे काम बंद पडले. ते का रखडले याचे कोडे शेतकर्यांना सापडलेच नाही.
करोना रोखण्यासाठी राहाता तालुक्याने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबविल्या. यासाठी साई संस्थानने स्वतंत्र कोवीड रूग्णालय सुरू केले. मोफत सेवा पुरविली तर राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी संस्थानने 51 कोटीचा निधी मुख्यमंत्री निधीला देऊन साईबाबांचा आरोग्य सेवेचा वसा पुढे चालविला. महसुल व आरोग्य विभागाने करोना काळात दिवसरात्र मेहनतीने करोनावर नियंत्रणासाठी कार्य केले. तरीही 60 जणांचा तालुक्यात करोनाने बळी घेतला. तालुक्यात 3205 नागरीकांना कोरोना झाला त्यात 3113 रूग्ण बरे होऊन घरी गेले. तर 29 हजाराहून अधिक कोरोना टेस्ट करन्यात आल्या.
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला. पेरू, डाळींब, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान सोयाबीन, बाजरी व भाजीपाला पिकांचे पुर्णतः नुकसान झाले. सरकारने मदत घोषीत केली मात्र बोटावर मोजण्याईतपत शेतकर्यांना ती मिळाली. बाकी शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित. हाता तोंडाशी आलेला घास अगोदर कोरोना व नंतर अतिवृष्टीने हिरावल्याने शेतकरी राजा कर्जबाजारी झाला आहे.