राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आठवडे बाजार बरोबर गुरूवारी राहाता शहर अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश
राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिले आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही वाढ जिल्ह्यात दोन नंबरची असल्याने चार दिवसांपुर्वीच तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व गावातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
करोना संसर्ग पाहता होणारी गर्दी टाळण्यासाठी राहात्याचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी गुरूवारी आठवडे बाजार बंद बरोबर राहाता शहरातील सर्व व्यापारी दुकाने व व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले असून यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
रुग्ण वाढ कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी नागरिक याचे गांभीर्य पाळत नाही. त्यामुळे गर्दी होणारी सर्व ठिकाणे एक दिवस पूर्णत: बंद करण्याचा हा निर्णय तहसीलदार यांच्या सुचनेवरून घेतला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सतत हात साबणीने स्वच्छ धुवून काढावेत, मास्क वापरावे, विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, असे आवाहन मुख्याधिकारी निकत यांनी केले आहे.