Thursday, April 25, 2024
Homeनगरपुणतांबा-रोटेगाव रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तीव्र नाराजी - चव्हाण

पुणतांबा-रोटेगाव रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तीव्र नाराजी – चव्हाण

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

परिसराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा-रोटेगाव या नियोजित रेल्वे मार्गाकडे संसदेत नुकत्याच सादर केलेल्या अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद न केल्यामुळे केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. केंद्राच्या या धोरणामुळे पुणतांबेकरांचा अपेक्षा भंग होऊन परिसरात तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस सेलचे उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

- Advertisement -

पुणतांबा-रोटेगाव हा अंदाजे 25 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग व्हावा ही पुणतांबा परिसराची गेल्या 25 वर्षापासूनची मागणी आहे. माजी रेल्वेमंत्री नितीश कुमार हे पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्गाच्या भूमिपूजनाला आले असता त्यांनी या रेल्वे मार्गाला तांत्रिक मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण सुद्धा झाले होते. मात्र नंतर या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मागे पडला व त्याऐवजी रोटेगाव-कोपरगाव रेल्वेमार्गाची चर्चा सुरु झाली. मात्र या रेल्वेमार्गाबाबत पुढे काहीही झाले नाही.

पुणतांबा-रोटेगाव रेल्वेमार्ग दक्षिणेकडील राज्यातील भाविकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त होता. भाविकांना शिर्डीला अत्यंत कमी वेळेत जाणे शक्य होणार होते. तसेच वेळ व पैशाची बचत होणार होती. पुणतांबा परिसर व गोदावरी नदीकाठच्या गावाच्या विकासाला मदत होणार होती. मात्र देशाच्या अर्थसंकल्पात तसेच रेल्वेच्या अंदाजपत्रकातही या रेल्वेमार्गाला स्थान मिळत नसल्यामुळे भविष्यात हा रेल्वेमार्ग होईल की नाही? याबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या