नाशिक । प्रतिनिधी Nashik
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवित काँँग्रेसच्या माजी प्रवक्त्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी महापालिकेत टक्केवारीने परिसिमा गाठली असल्याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.
स्मार्ट सिटीच्या प्रत्येक टेंडरमध्ये अधिकार्यांकडुन केली जाणारी टक्केवारीची मागणी व मंत्रालयातून महापालिकेत होणार्या पोस्टिंग आपण पुराव्यासह सादर करणार असल्याचे सांगत डॉ. पाटील यांच्या या पत्राने शहरात खळबळ उडवून दिली आहे.
डॉ. हेमलता पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना एक पत्र पाठवित महापालिकेतील कथित भ्रष्टाचार – गैरकारभारावर अंकुश लावण्याची मागणी केली आहे. नाशिक महापालिकेत टक्केवारीने परिसिमा गाठली असल्याचे स्पष्ट करीत डॉ. पाटील यांनी महापालिकेत टक्केवारी व्यतिरीक्त इतर कोणत्याही गोष्टीवर चर्चा होत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.
कोणीही मंत्रालयात जावे आणि कोणत्याही पोस्टींगचे पत्र घेऊन यावेत ही परिस्थीती आहे. सध्या महापालिकेत महत्वाच्या पदावर सगळे परसेवेतील अधिकारी आहेत. पदोन्नती कमेटीची बैठक होऊन स्थानिक अधिकार्यांना पदोन्नतीची संधी मिळावी.
उलटपक्षी परसेवेतील अधिकारी महापालिकेकडे पैसे कमविण्याची संधी म्हणून पाहत असल्याचा अनुभव आहे. नगरविकास खाते आपल्याच पक्षाच्या ताब्यात आहे. अशावेळी महापालिकेत होणार्या चुकीच्या गोष्टीवर अंकुश ठेवला जावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.