Friday, April 26, 2024
Homeनाशिकविडी उद्योगातून समाजाची जडणघडण झाली

विडी उद्योगातून समाजाची जडणघडण झाली

नाशिक । प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात योगदान देतांना विडी उद्योगाने समाजाची जडणघडण केली, असे मत साहित्यिक प्रा. शंकर बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले. डिजिटल वसंत व्याख्यानमालेत ‘विडीची गोष्ट’ या विषयावर अठरावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते…

- Advertisement -

स्व. रामनाथशेठ चांडक स्मृती व्याख्यानात बोऱ्हाडे यांनी विडी उद्योगामुळे प्रसिद्ध असलेल्या सिन्नर शहराचा ऐतिहासिक आढावा घेतला जुन्या काळात विडीला औषधांचे स्वरूप दिले गेले होते,सर्दी,खोकल्यासारखे आजार झाल्यास लहान-मोठ्यांना विडी प्यायला लावत असे.

एकूणच विडीला ‘आजीबाईच्या बटव्यात’स्थान होते,कधी काळी यादव साम्राज्याची राजधानी असलेल्या सिन्नरने वैभवाचे दिवस बघितले,पण पेशवाईचा अस्त, प्लेगची साथ,दुष्काळ यामुळे सिन्नरची संपन्नता लयास गेली.अशा वेळी विसाव्या शतकाच्या प्रारंभी विडी उद्योगाने

सिन्नरला हात दिल्याचे प्रा. बोऱ्हाडे सांगतात. बाळाजी वाजे जनावरे चारण्यासाठी भिवंडी, पडघा इथे गेले,तिथे त्यांनी विडी बघितली,त्यातील कलाही जाणून घेऊन त्यांनी सिन्नरला विडी उद्योगाची पायाभरणी केली.पुरुष दुष्काळी कामासाठी जात होते,तेव्हा महिलांना वाजे यांनी प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला,म्हणून या उद्योगात महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे प्रा. बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.

या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या

स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्याने विडीला मागणी वाढली.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करास विड्याची कमतरता भासू लागली,तेव्हा मुंबईच्या एका ठेकेदाराने सारडा-चांडक यांना एक कोटी विड्या बनविण्याची ऑफर दिली.हा एक टर्निंग पॉईंट होता.

ही मागणी लवकर पूर्ण करण्यासाठी संगमनेर, अकोला,सोलापूर अशा ठिकाणी विडी कारखाने निघून या उद्योगाचा विस्तार झाल्याचे प्रा. बोऱ्हाडे यांनी नमूद केले.भारत -चीन युद्धाप्रसंगी तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सारडा परिवाराने अकरा तोळे सोने दिल्याची आठवण प्रा. बोऱ्हाडे यांनी सांगितली.

जिनिव्हाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही ‘गरिबांची विडी’ सारडांनी प्रतिष्टेने सादर केली होती. या उद्योगातून कामगार नेतृत्व घडले,राजकीय नेतेही तयार झाले,विडी वसाहती वाढल्या,राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यात विडी उद्योगाचे योगदान असल्याचे प्रा. बोऱ्हाडे यांनी उद्धृत केले.

याप्रसंगी योगाचार्य अशोक पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले,तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या