संगमनेर |वार्ताहर| Sangamner
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या बदल्यांची प्रक्रिया नव्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यास उशीर झाला होता. तथापि त्याला मुहूर्त मिळाला असून संवर्ग एक मधून साडेआठ हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्याचे वृत्त हाती आले आहेत. संबंधित शिक्षकांना या संदर्भातील माहिती त्यांच्या लॉगिनहून उपलब्ध होणार आहेत.
शिक्षकांच्या बदल्या या गेले काही वर्ष वादाच्या भेवर्यात सापडल्या होत्या. त्यानंतर महाविकास आघाडीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व इतर चार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती गठित केली होती. त्यांनी विविध शिक्षक संघटनांसोबत संवाद साधून शासन निर्णय निर्गमित केला होता. त्यानुसार दिवाळी पूर्वीपासूनच शिक्षकांच्या बदल्या होणार यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र कार्यवाहीला मुहूर्त सापडत नव्हता.
यापूर्वी शासनाने आदेश देऊनही आणि नियोजन करूनही वारंवार प्रक्रिया पुढे ढकली जात होती .अखेर प्रक्रियेतील पहिल्या टप्पा पूर्ण करण्यात राज्य शासनाला यश आले आहे. यापूर्वी राज्य सरकारने निर्देश दिल्याप्रमाणे संवर्ग एक मधील कर्मचार्यांनी बदली प्रक्रियेसाठी आपल्या हवे असलेल्या शाळा अथवा नको असल्यास यासंबंधीची माहिती संकेतस्थळावर नोंदवल्यानंतर राज्य शासनाने संबंधित शिक्षकांना बदली प्रक्रियेत समाविष्ट करून घेतले होते. साडेआठ हजार शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात या बदल्या करण्यात आल्यानंतर संबंधित कर्मचार्यांच्या ईमेल आयडीवरती त्यांची बदली कुठे झाली आहेत हे संबंधित कर्मचार्यांना आदेशाद्वारे समजदार आहेत. यानंतर राज्य सरकार 18 फेब्रुवारीपर्यंत सर्व संवर्गातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. संबंधित कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या तरी त्यांना शाळेवरून कार्यमुक्त करणे आणि नव्या शाळेवरती हजर करणे यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यावर्षीच्या बदल्या पूर्ण करण्यात यश मिळाले असले तरी एप्रिल मे महिन्यात पुढील वर्षांची बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.