Friday, April 26, 2024
Homeनगरप्रतापपूर परिसरात कुत्र्यांचा धुमाकूळ

प्रतापपूर परिसरात कुत्र्यांचा धुमाकूळ

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीजची लागण होऊन सात गायींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरातील शेतकर्‍यांसह नागरीकांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील ट्रक वाहतुक संस्थेचे संचालक शिवाजीराव इलग यांनी केली आहे.

- Advertisement -

प्रतापपूर गावात रेबीजची लागण झाल्याने सलिम शेख, अनिल गोसावी, आबा सांगळे, ज्ञानेश्वर माळी, हरिभाऊ दराडी यांच्या सहा गायींचा मृत्यु झाला असून हौसाबाई बिडवे यांच्या गायीला लागन झाल्याने वेगळे ठेवण्यात आले आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी प्रतापपूर दाढ रस्त्यावरील कुरण परिसरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्रे आणुन सोडण्यात आले. यापैकी रेबिज बाधित असलेल्या कुत्र्यामुळे परिसरातील गायी रेबीज बाधित झाल्यामुळे सोमवारपासून गायी दगावण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील शेतकर्‍यांकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे.

तसेच ऊस तोडणी मजुर त्यांची मुले व जनावरांना रेबीज बाधित कुत्र्याने चावा घेतल्यास मोठा अनर्थ निर्माण होण्याची शक्यता आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रतापपूरचे सरपंच दत्तात्रय आंधळे, शिवाजीराव इलग यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. आर शिंदे यांच्याशी संपर्क साधला आसता त्यांनी तातडीने प्रतापपूर गावातील नुकसान ग्रस्त शेतकर्‍याच्या पशुधनाची तपासणी करत लसीकरण करण्यास सुरवात केली आहे. निमगावजाळी आरोग्य केद्राचे प्रमुख डॉ. तांबोळी यांनी संपर्कात आलेल्या सुमारे चाळीस शेतकर्‍यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले आहे.

प्रतापपूर व आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीसह उंबरी व मांचीकडे जाणार्‍या रस्त्यावर मोकाट कुत्र्यांच्या मोठ्या टोळ्या रस्त्यावर बसून येणार्‍या जाणार्‍या नागरीकांना त्रास देत असतात. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान दुधाळ गायी दगावल्याने शेतकर्‍याचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून या शेतकर्‍यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच दत्तात्रय आंधळे, आ. राधाकृष्ण विखे ट्रक वाहतुक सोसायटीचे संचालक शिवाजीराव इलग, डॉ. बाळासाहेब आंधळे, पांडुरंग आंधळे, किरण आंधळे, गोरक्षनाथ घुगे, गणेश इलग, विकास आंधळे, महेंद्र सांगळे आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या