नाशिक । प्रतिनिधी
राज्यात राजकीय पक्षांच्या फोडाफोडीमुळे निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणात मतदारांमध्ये कमालीची नाराजी उमटत आहे. मतदार विश्वासाने मतदान करून पक्षाला निवडून सत्तेवर बसवतातत. मात्र इथे सत्तेवर आलेले नेते स्वत:च्या स्वार्थासाठी सामान्य जनतेच्या मनाविरुद्ध खेळ खेळत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. सत्तेच्या राजकारणात मतदारांचा विचार केला जात नसल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत.
तरुणांनी राजकारणात यावे
स्वत:ची राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी बहुतांश नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ केला आहे. राज्याच्या राजकारणात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकारणाची पातळी खालावली असून, खुर्चीसाठी नेते हल्ली काहीही करायला तयार झाले आहेत. यापुढे तरुणांनी पुढे येऊन राजकारणात सहभाग घेतला पाहिजे.
सागर भास्कर पेखळे, दूध उत्पादक
मतदान करावे की नाही?
राज्यात सुरू असलेले राजकारण म्हणजे सामान्य जनतेच्या कल्पनेच्या पलीकडे गेले आहे. राजकारण्यांनी विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यामुळे राजकारणाचे शेवटी काय होते, याची वाट सामान्य जनता पाहत आहे. विश्वासाने मतदान केलेले नेते असे कृत्य करत आहेत की मतदान करावे की नाही असा मोठा प्रश्न पुढे उभा राहिला आहे .
राहुल विठ्ठल आहेर, फूल उत्पादक शेतकरी
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
राजकारण कोणाच्या हिताचे?
लोकांनी केलेल्या मतदानाचा कोणता फायदा जनतेला होतो आहे? राजकारणी लोक स्वत:चा स्वार्थ बघत आहेत. मात्र सामान्य नागरिक याचा त्रास सहन करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राजकारण नक्की कोणाच्या हिताचे, असा प्रश्न युवा मतदार म्हणून आम्हाला पडता आहे. सत्ता कोणाकडे असली तरी लोकांच्या हितासाठी कोण कामे करणार हे महत्त्वाचे आहे.
निशा उत्तम महिरे, महाविद्यालयीन विद्यार्थिनी
चांगला विकास होणार
हिंदुत्व टिकवून ठेवण्यासाठी हा राजकारणाचा प्रयत्न योग्य आहे. काही प्रमाणात जनतेचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे तीन पक्षांचे सरकार चांगल्या पद्धतीने विकासाचे काम करेल.
कैलास गोविंदराव जेऊघाले, हॉटेल व्यावसायिक
राजकारण्यांना टायटॅनिक दाखवा
महाराष्ट्राचा विकास बुलेट ट्रेनच्या गतीने होणार आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजणार्या सर्वच नेत्यांना जनतेने जागा दाखवायला हवी. या सर्व राजकारण्यांना टायटॅनिक जिथे बुडाले ती जागा दाखवायला नेेले पाहिजे.
सुनील गायकवाड, सलून व्यावसायिक