नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक शहरातील संघटित व चौकातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आता गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईतांची बारीकसारीक माहिती गोळा करून त्यांची एकप्रकारे कुंडलीच तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुंडाची आधारकार्डासह सर्वंकष माहिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, आजूबाजूचे वातावरण, स्थावर व जंगम मालमत्ता, तसेच त्याचे मित्र व आश्रयदात्यांची नावे यात सामाविष्ट केली जाणार आहेत. यामुळे शहरात गुन्हेगारी घटना घडल्यावर या तपशीलाची मदत पोलिसांना त्वरित उपलब्ध होणार आहे. यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होणार असून शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वाढते कोयते हल्ले लक्षात घेता कोयता विक्री करणार्यांसाठी स्वतंत्र मनाई आदेश काढून कोयत्यांवर नियंत्रण आणले. सध्या शहरातील गुन्हे व अंतर्गत कुरबुरींवर नियंत्रण कसे मिळवता येईल, यासाठी आयुक्त मुख्यालय व नियंत्रण कक्षाच्या जोरावर पॅटर्न राबवत आहेत. असे असताना शहरातील खून, जबरी लूट, प्राणघातक हल्ले, गावठी कट्टे, पिस्तुलांवर नियंत्रण आणण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करून सराईताना पळता भुई थोडी करण्यासाठी सरसावले आहेत.
नाशिकहून ‘या’ तीन शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु
शहरात वैयक्तिक वादातून सार्वजनिक ठिकाणी गंभीर दुखापतीचे हल्ले होत आहेत. ते स्थानिक टोळी वा वैयक्तिक रागातून होत असल्याचे समोर आले आहे. त्यास पायबंद घालण्यासाठी या सर्वच गुंडांची माहिती गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यांनी संकलित केली आहे. संशयितांचे अभिलेख तयार होत असून, एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील संशयितांची फुटकळ माहिती पोलिसांकडे असते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यास अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; पत्नीचा मृत्यू; पती गंभीर जखमी
हीच शर्यत कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी आता दोन किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची माहिती अपडेट केली जात आहे. आयुक्तालयाकडे बहुतांश हिस्ट्रिशीटरची नावे आहेत. मात्र, त्यात त्यांचा कायमचा पत्ता, आधारकार्ड, बँक खात्यांची माहिती, तसेच स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती नाही. सोबतच संशयिताची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, त्याचे आई, वडील, बहीण, भाऊ, नातलग व मित्र काय करतात, तो कोणाच्या संपर्कात असतो, याची माहिती अपडेट केली जात आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.