मुंबई | Mumbai
महाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत पोलिस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली होती.
मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची वेबसाइट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाउन होणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे राज्य सरकारने अर्ज भरण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवली आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पोलीस भरतीच्या संदर्भात आतापर्यंत आमच्याकडे ११ लाख ८० हजार अर्ज आलेले आहेत. तथापि काही ठिकाणांहून ही तक्रार येते आहे की, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख आम्ही १५ दिवसांनी वाढवतो आहे. १५ दिवस अधिकचे आम्ही देत आहोत, त्यामुळे उर्वरीत ज्या तक्रारी आहेत, त्याही दूर होतील.”