पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :
आदिवासींचे कुलदैवत कंसरा गडावर जाण्यास गुजरात सरकारने ऐन वेळेस बंदी घातल्याने गुजरात सिमेवरच आठ ते दहा हजार डोंगर्यादेव भक्तांनी ठिय्या मांडला. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती याठिकाणी तयार निर्माण झाली आहे.
दरम्यान नुकतेच महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते महाराष्ट्रात देवालये उघडण्यासाठी आंदोलन करत होते, ते आता गप्प का, असा सवालही आदिवासी बांधवांनी उपस्थित करत गुजरात सरकार अन्याय करीत असल्याची भावना पोपटराव मालचे यांनी व्यक्त केली.
धुळे, नाशिक जिल्ह्यातून आदिवासी बांधव गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील कंसरा गडावर जातात. दरवर्षाप्रमाणे सटाणा, मालेगाव साक्री, धुळे-नंदुरबार जिल्ह्यातून आज कंसरा गडावर जाताना झाकराय बारीतच गुजरात सरकारने सर्व भाविकांना बंदी घातल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी आ. मंजुळाताई गावित, माजी खा. बापू चौरे, डॉ. तुळशीराम गावित, आदिवासी बचाव अभियानचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. अशोक बागुल, नाशिक जिल्हा अध्यक्ष रावण चौरे यांच्यासह अनेक संघटनेच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकारी व केंद्रीय वनमंत्री वसावे यांची भेट घेऊन परवानगी घेतली होती.
ती प्रत्येक पंचायतीचे गावातील पाच भक्तांना परवानगी दिली होती. मात्र आज गुजरात सरकारने या आदिवासी भक्तांना दर्शनासाठी जाण्यासाठी रोखल्याने गुजरात डांग सिमेवर हजारो भाविकांनी ठिंय्या आंदोलन केले.
महाराष्ट्रात भाजप नेते मंदिर उघडण्यासाठी आंदोलने करीत होते. मग ते आता गप्प का आहेत. आमच्या कुलदैवताचे दर्शन मिळत नसल्याने तीव्र संताप पोपटराव मालचे यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांचे दैवत डोंगर्या देव आहे.
त्यामुळे ते कंसरा गडावर जातीलच, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. आता गुजरात सरकार याबाबत काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागून आहे.