कावनई । Kavnai
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भाग सिन्नर मतदारसंघाला जोडल्या गेल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष असून पिपळगाव मोर ते सर्वतीर्थ टाकेद- वासळी फाटापर्यंत रस्त्यांची चाळण झाली असून बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या मार्गावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. मात्र याकडे बांधकाम विभाग डोळेझाक करत असल्याने या परिसरातील रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सर्वतीर्थ टाकेद ते वासाळी फाटा- भंडारदरा रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताची संख्या प्रमाणात वाढली आहे.
पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या भंडारदऱ्याला जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच परिसरातील वाहनचालक, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी, वयोवृद्ध ग्रामस्थ आदींना या रस्त्याने नेहमी ये-जा करावी लागते. परिणामी रास्ता खराब असल्याने सारवान कसरत करावी लागते.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कमीत कमी 15 किमीचा रस्ताची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. रस्त्याची दुरावस्था असल्याने इगतपुरी आगार वगळता इतर बस सेवा बंद आहेत. बस वाहतूक पुन्हा सुरु करावी, अन्यथा परिसरातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.