Saturday, April 27, 2024
Homeनगरअगस्तीच्या हितासाठी कारखान्यात राजकारण आणू नका - पिचड

अगस्तीच्या हितासाठी कारखान्यात राजकारण आणू नका – पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ती कारखान्यात कुणीही राजकारण आणू नये असे सांगतानाच पिचडांनी 40 वर्ष काय केले अशी टीका

- Advertisement -

करणार्‍यांनी साधी पिठाची गिरणी तरी काढली का असा टोला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा कारखाण्याचे विद्यमान चेअरमन मधुकरराव पिचड यांनी कारखाना विरोधकांना लगावला.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झूम द्वारे ओनलाईन पध्दतीने पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री पिचड हे होते. यावेळी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभागृहातून ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, माजी आमदार वैभवराव पिचड, कार्यकारी संचालक भास्करराव घुले, संचालक प्रकाशराव मालुंजकर, मीननाथ पांडे, गुलाबराव शेवाळे, कचरू पाटील शेटे, रामनाथ बापू वाकचौरे, अशोकराव देशमुख, अशोकराव आरोटे, राजेंद्र डावरे, भाऊसाहेब देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, महेशराव नवले, सुनील दातीर, भास्कर बिन्नर, सुरेखाताई देशमुख, मनिषाताई येवले, बाळासाहेब ताजणे आदी उपस्थित होते. झूम अ‍ॅपद्वारे मीटिंगला 283 सभासद जोडले गेले होते.

यावेळी पिचड पुढे म्हणाले, अगस्ती कारखान्यात आपल्याला राजकारण आणायचे नाही, आपण ते कधी येऊही दिले नाही. सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेऊन आपण कारखाना चालविला. तालुक्याने नेहमीच लोकशाहीचे कौतुकच केले आहे. जे सभासद नाही त्यांना देखील बोलण्याची संधी आपण दिली. मधली दोन वर्ष कारखाना कारखान्यात राजकारण आणल्यामुळे बंद पडला तेव्हा संपूर्ण तालुका आपल्याकडे आला आणि कारखाना चालवा म्हटले म्हणून आपण तो चालवला. विरोधक अपप्रचार करीत असून आज त्यांना आपण समोरा समोर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली असती, वेळ आल्यावर आपण त्यांच्या आरोपांना भक्कम उत्तरे देऊ. यावर्षी ऊस तोडीचे थोडे नियोजन चुकले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो येत्या महिन्यात सर्व ऊस तोडला जाईल. पाण्यासाठी आपण नेहमीच भांडत राहिलो. तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून दिले. चाळीस वर्षात काय केले म्हणणार्‍यांना काम केले हेच उत्तर आहे. येणार्‍या तीन वर्षात आपण कारखाना कर्जमुक्त करू, असेही पिचड यांनी सांगितले.

कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर प्रास्तविकात म्हणाले , अगस्ती कारखाना ही तालुक्याची कामधेनू आहे. त्याच्यावर अनेक कामगार शेतकरी अवलंबून आहे. त्या कारखान्याची बदनामी होईल पत कमी होईल असे करू नका राजकारण जरूर करा पण राजकारणाच्या ठिकाणी जरूर करा. अगस्ती कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमच्यावर केला जातो त्याची जरूर चौकशी करा. त्यात आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला फाशी द्या. शेतकर्‍यांना भाव देण्यासाठी कर्ज घेणे यात गैर काय आहे? इथेनॉल प्रकल्पावर कर्ज घेतले ते अनाठायी वापरलेले नाही. कारखान्याच्या संपत्तीचे खोटे मूल्यांकन करून कर्ज घेतल्याचा आरोप विरोधक करतात यात तथ्य नाही.

या सभेत शेतकर्‍यांचे नेते दशरथ सावंत व बी. जे. देशमुख यांनी कारखाना प्रशासनाला काही लेखी प्रश्न विचारले होते, त्याला उत्तरे द्या यावर कार्यकारी संचालक यांनी त्यास आपणास लेखी उत्तर दिले जाईल असे सांगितले. तर यावेळी झालेल्या चर्चेत आमदार डॉ. किरण लहामटे, अ‍ॅड. बी. जी. वैद्य, सुरेश नवले, दिलीप नाईकवाडी, प्रमोद मंडलिक, विकास शेटे यांनी सहभाग नोंदविला. कार्यकारी संचालक भास्करराव घुले, ज्येष्ठ संचालक अशोकराव देशमुख व मच्छिंद्र धुमाळ यांनीही विरोधकांच्या प्रश्नांना संचालक मंडळ च्या वतीने उत्तरे देण्याचा प्रयत्न केला पण विरोधकांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना उत्तरे देऊ द्या म्हणत आरडाओरडा केला.

सभेचे नोटीस वाचन भास्कर घुले यांनी केले तर गट वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचन मुख्यलेखापाल एकनाथराव शेळके यांनी केले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी सभासदांनी विचारलेल्या सभासदांना उत्तर देताना सांगितले कि, साखर निर्यात करताना कुठलाही गैरव्यवहार झाला नसून शासनाने ठरवून दिलेल्या नियमातच ती विक्री केली असून त्यातील निर्यात तोटा अनुदानही प्राप्त झाले आहे. यावर्षी सुमारे 44 कोटींची कर्ज फेड केली आहे. असेही ते म्हणाले तर सभेच्या शेवटी आभार मच्छिन्द्र धुमाळ यांनी मानले. सभेत काही वेळ विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे उपस्थित सभासदांमधून पिचड साहेब व गायकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणा दिल्या.

सीताराम पाटील गायकर आक्रमक

अगस्ति कारखान्याचे माजी लेखापाल दिवंगत मारुती भांगरे यांनी अगस्ति कारखानाच्या भ्रष्ट्राचाराचा पंचनामा हि पुस्तिका प्रकाशित केली होती. यावर दशरथ सावंत व बी. जे. देशमुख यांनी संचालक मंडळाला याची उत्तरे द्या, यावर ज्या मारुती भांगरे यांनी दहा हजार पोती संचालक मंडळाला न विचारता विकली त्या प्रकरणी त्यांना निलंबित केले त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची? असे म्हणत आम्ही त्याला लेखी उत्तर देऊ, इथे देण्याची गरज नाही असे म्हणत सीताराम गायकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या