औरंगाबाद – Aurangabad
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील बाधित दर कमी होण्याच्या दृष्टीने कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. त्यादुष्टीने व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थांच्या सहभागातून यंत्रणांनी चाचणी मोहीम सक्रीयपणे राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या. ग्रामीण भागात चाचणी न करता दुकाने सुरु ठेवल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्रामीण भागात कोविड चाचण्यांमध्ये वाढ करण्याच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला आरोग्य यंत्रणेतील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ग्रामीण भागात कोविड चाचण्या वाढवण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सूचित करून गावामध्ये सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, धार्मिक विधी करणारे यासह सर्व नागरिकांच्या चाचण्या करण्याचे प्रमाण वाढविण्याचे सूचित केले.
ब्रेक द चेनच्या या टप्प्यात बाजारपेठ सुरू करण्यास आता परवानगी देण्यात आली असून गर्दीचे प्रमाण यामुळे वाढणार आहे. त्यातून निर्माण होणारा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी सर्व दुकाने, व्यापारी, व्हॉटेल, सर्व व्यावसायिक आस्थापनांनी त्यांच्या मालक, कर्मचारी या सर्वांचे कोविड चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे.
विनाचाचणी कोणत्याही दुकानदाराला व्यापार्याला व्यवसाय, विक्री करता येणार नाही, यासाठी संबंधितांनी येत्या रविवारच्या आत चाचण्या करणे बंधनकारक आहे. विना चाचण्या दुकान उघडणार्यांवर स्थानिक यंत्रणांनी तातडीने कारवाई करून दुकान सील करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले आहेत. सर्व उपस्थित अधिकार्यांनी चाचण्या वाढवण्याबाबतच्या नियोजनाची यावेळी माहिती दिली.
मुदतीनंतरही चाचणी न करता दुकान सुरू ठेवणार्यांची दुकाने सील करण्यात येतील. त्याबाबत त्यांना पूर्वकल्पना दिली जाईल. तसेच शंभर टक्के चाचणी करणार्या व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांचा गौरवही करण्यात येणार आहे. कोवीड लस घेतलेल्यांना चाचण्याधून सुट मिळेल मात्र लस घेतलेल्यांपैकी लक्षणे आढळून आलेल्यांची चाचणी करणे बंधनकारक राहील.
चाचण्यांसाठी लोकांनी उत्स्फुर्तपणे पुढे यावे यासाठी यंत्रणेने नाविण्यूपूर्ण उपक्रम राबवून ग्रामीण भागामध्ये चाचणी मोहिम ही लोकचळवळीच्या स्वरुपात यशस्वीरित्या राबवावी. जेणेकरुन लवकरच औरंगाबाद शहराप्रमाणे ग्रामीणही स्तर तीन मधून एकमध्ये आणता येईल, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.