दिल्ली l Delhi
संसदेचे हिवाळी अधिवेशस (Monsoon Session)आजपासून सुरु झाले. करोना, महागाई, कृषी कायदासोबत पेगासस (Pegasus) नामक सॉफ्टवेअरमुळे हे अधिवेशन गाजणार आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतातील पत्रकार, राजकीय नेते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे फोन हॅक केल्याचा आरोप केला जात आहे.
फोन हॅकींग प्रकरणात वादळ निर्माण करणारे पेगासस आहे काय?
पेगासस सॉफ्टवेअर वापरून पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत होती, याची पुष्टी फॉरेन्सिक तपासातून झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान मोदी सरकारमध्ये नवनिर्वाचित माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (IT Minister Ashwini Vaishnaw) यांनी संबंधित आरोप आणि अहवालावर सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘रविवारी रात्री एका वेब पोर्टलवर अतिशय खळबळ उडवून देणारी बातमी चालवण्यात आली होती. या बातमीमध्ये मोठे आरोप लावले गेले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी अशी बातमी प्रसिद्ध झाली हा योगायोग असू शकत नाही.”
तसेच, ‘व्हॉट्सअॅप पेगॅससच्या वापरासंदर्भात पूर्वी असेच दावे केले गेले होते. त्या अहवालांना कोणतेही तथ्यहीन आधार नव्हते आणि सर्व पक्षांनी नकार दिला. १८ जुलैचा पत्रकार अहवालही भारतीय लोकशाही आणि तिथल्या सुस्थापित संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते’. असे वैष्णव यांनी म्हटले.
त्याचबरोबर, ‘फोन क्रमांकाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींचे डिव्हाईस पेगासस सॉफ्टेवेअरच्या माध्यमातून हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा कोणताही पुरावा यात देण्यात आलेला नाही. त्यामुळे देण्यात आलेले फोन क्रमांक खरंच हॅक झाले होते का हे सिद्ध होत नाही. आपल्या देशाच्या प्रबळ संस्थांमध्ये हेरगिरी किंवा अवैध पद्धतीनं पाळत ठेवणं अजिबात शक्य नाही. देशात यासाठी एक चांगली प्रक्रिया आहे की ज्यामाध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्देशातून इलेक्ट्रॉनिक संचाराचं सुयोग्य पद्धतीनं पालन होत आहे’, असंही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे.