अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पांढरीपुल (ता. नगर) येथील जय भवानी कला केंद्रातून एक लाख 15 हजार 500 रूपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. 5 सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून या प्रकरणी शनिवार, 17 सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा भरतराम पालवे (वय 45 रा. पांढरीपुल) यांनी फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत म्हणून ईब्राहिम शेख, सिकंदर अब्दुल पठाण, अखतर शेख, कविता श्रीकांत चव्हाण, सुनिता शेख, तब्बसुम शेख हुसेन (सर्व रा. सेलु जि. परभणी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांढरीपुल येथील जय भवानी संस्कृती कला केंद्रातून वरील सहा जणांनी फिर्यादी यांचे पती भरतराम पालवे यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. कपाटामध्ये ठेवलेली एक लाख 15 हजार 500 रूपयांची रोख रक्कम त्यांनी चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक गांगर्डे करीत आहेत.