करंजी (वार्ताहर) –
कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासह पांढरीचा पूल, नेवासा, शेवगाव या महामार्गावरील रस्त्यावर वाहतुकीचे नियम न पाळणार्या
तेवीस हजार 487 वाहनांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून एक कोटी 19 लाख 29 हजार सहाशे रुपयांचा दंड महामार्गावरील वाहतूक पोलीस पथकाकडून वसूल करण्यात आला आहे.
याबाबत करंजीघाट येथील महामार्ग पोलीस विभागाच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सविस्तर माहिती अंतर्गत 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासह शेवगाव, पांढरीचा पूल, नेवासा या महामार्गावर महामार्ग पोलीस पथकाकडून महामार्गावर प्रवास करताना महामार्गाचे नियम धाब्यावर बसवणार्या 23 हजार 487 वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1 कोटी 19 लाख 29 हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपाधिक्षक प्रीतम यावलकर, नगर महामार्ग विभागाचे पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये करंजी विभागाचे एएसआय धिवर, गोल्हार, कराड, पोटे, कांबळे, आव्हाड यांच्यासह पथकातील सर्व हवालदार, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.