श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक तरूण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. तालुक्यातील पढेगाव-मालुंजा रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील बोरकरवस्तीजवळ वळणावर काल सायं. 5.30 वा. हा भीषण अपघात झाला.
पढेगाव ते मालुंजा रस्त्यावर उदय ज्ञानेश्वर पवार (वय 23, रा. माहेगाव, ता. राहुरी) व विजय रामदास गलांडे (वय 22, रा. माहेगाव, ता. राहुरी) हे दुचाकीवरून (क्र. एमएच 17 बीडब्ल्यू 0798) चालले असताना पढेगाव शिवारातील विठ्ठलवाडी येथील बोरकरवस्तीजवळील वळणावर महिन्द्रा व्हिरोटो या चारचाकी गाडीवरील (क्र. एमएच 20 सीएस 2697) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात गाडी चालवून समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील उदय ज्ञानेश्वर पवार हा जागीच ठार झाला तर विजय रामदास गलांडे हा गंभीर जखमी झाला. या अपघाताबाबत किरण शिवाजी टेकाळे (रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी) यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून चारचाकी वाहन चालक दिलीप दत्तात्रय काळे (रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर) याच्याविरूद्ध भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटर वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब), 177 प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार श्री. हबीब हे पुढील तपास करीत आहेत.