बंगळुरू | Bangalore
बंगळुरूमध्ये विरोधी पक्षाच्या दोन दिवसांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. एकूण २६ पक्ष या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या फॉर्म्युलासह या पक्षाच्या आघाडीला नाव ठरवण्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आघाडीचं नाव जाहीर केलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ (INDIA) असे नाव देण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचं हे नाव टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कालच्या बैठकीत सुचवलं होतं, ज्यावर बहुतेक विरोधकांनी सहमती दर्शवली.
विरोधी आघाडीच्या INDIA चा अर्थ काय?
I – भारतीय (Indian)
N – राष्ट्रीय (National)
D – लोकशाही (Democratic)
I – सर्वसमावेशक (Inclusive)
A – आघाडी (Alliance)
बंगळुरूमध्ये जमलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटले, “ही एक चांगली आणि अर्थपूर्ण बैठक आहे. आज झालेल्या चर्चेनंतरचा निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो.” दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत बोलताना ‘सर्वजण मिळून भाजपचा पराभव करू’ असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुग खरगे यांनी सांगितले. आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचे रक्षण करण्याचा आमचा हेतू आहे. तसेच राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र हे मतभेद विचारधारेशी संबंधित नाहीत, असे खरगेंनी स्पष्ट केले.