श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
यापूर्वी कांदा जीवन आवश्यक वस्तूच्या यादीत समाविष्ट असताना शेतकर्यांच्या कांद्याला कधीही हमी भाव मिळाला नाही.
बाजारात कांदा 25 पैसे ते 1 रुपया किलो विकत असताना कांद्याला भाव नसताना शेतकर्यांना कांदे उकीरड्यावर फेकून द्यावे लागले. त्यावेळेस कोणत्याही सरकारला शेतकर्याची काळजी वाटली नाही.
मागील रब्बी हंगामात देशात कांदा पिकावर आसमानी संकटाने पिकाची मोठी नासाडी होऊन साठवणूक केलेला सर्व कांदा खराब होऊन गेला होता. परंतु त्यावेळेस कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी शेतकर्यांच्या नुकसानीकडे लक्ष दिले नाही आणि त्यांना कुठलीही नुकसान भरपाई दिली नाही. त्याचा परिपाक आज बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने हेच लोक कांदा पिकविणार्यांपेक्षा खाणार्यांचे प्रतिनिधी होऊन देशातील शेतकर्यांना देशोधडीला लावून मिळेल त्या चढ्यादराने परदेशातून कांदा आयात करत आहेत.
शेतकर्यांच्या हितासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन झाले की, निर्यात बंदी हटवून निर्यात शुल्क वाढविला जातो. जेणेकरून इतर देशांच्या तुलनेत आपला कांदा महाग झाला की, कोणीही देश खरेदी करू शकत नाही. अशा एक-ना अनेक अडचणी उभ्या करून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले जाते.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याच्या मागणी पुरवठ्याचे संतुलन बिघडल्यामुळे कित्येकदा केंद्रातील व राज्यातील सरकारे बदलली परंतु शेतकर्यांचे देणे-घेणे नसणार्यांनी मध्यमवर्गीयांना कांदा स्वतात व फुकटात खायला मिळावा म्हणून त्यातून आपली सत्ता अबाधीत राहावी यासाठी कांदा आयात करून देशातील कांदा उत्पादक शेतकर्यांचा बळी घेतला जात आहे.
परतीच्या पावसाने खरिपातील लाल कांदा व रब्बीचे संपूर्ण रोपाचे नुकसान झाले आहे. 1000, 500 रुपये प्रति किलोला मिळणारे कांदा बियाणे 5 हजार रुपये प्रति किलो झाले 500 रुपयाला मिळणारे खताचे पोते 1500 रुपयाला झाले असून मजुरीत तीन पटीने वाढ झाली आहे.
औषधे-किटकनाशकांच्या किंमती गगनाला भिडल्या असून त्यावर कोणीही भाष्य करायला तयार नाही. व्यापार्यांचे साठे बाजारावर कारवाई म्हणून कांदा उत्पादकांचे लक्ष विचलित करून मनमानी भावाने परदेशातून कांदा आयात करून स्थानिक बाजार पेठेत निम्म्याने भाव पाडून कांदा उत्पादकांची फसवणूक करत असल्याचे शिवाजीराव जवरे यांनी म्हटले आहे.