भारतामध्ये आजचा दिवस (१६ डिसेंबर) हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी १९७१ साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाला आज ४९ वर्ष पूर्ण होत आहे.
डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशची निर्मिती केली.युध्दाची सुरुवात पाकिस्तानी आक्रमणाने झाली. भारत-पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या दुसऱ्या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर पाकिस्तानने गुडघे टेकत शरणागती पत्करली होती.
पाकिस्तानी लष्कराच्या पूर्व कमांडरने शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर हे युद्ध समाप्त झाले. या युद्धातून एका नव्या देशाची बांगलादेशची निर्मिती झाली. त्यावेळी भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे लेफ्टनंट जनरल जे एस अरोरा प्रमुख होते.
(फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पूर्व पाकिस्तानात चाललेल्या मानवी हत्यांमुळे भारतात मोठ्या संख्येने तिकडील लोक सीमा ओलांडून भारतात आश्रयास आले. सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या. अज्ञातवासातील बांगला सैनिकांनी व लष्करी अधिकार्यांनी लगेचच मुक्तिवाहिनीच्या स्वयंसेवकांना तयार करण्यास सुरुवात केली.पूर्व पाकिस्तानातील भयंकर हिंसाचारामुळे भारतात येणार्या आश्रितांची संख्या प्रचंड वाढली. ती १ कोटीच्याही वर गेली. भारतावर यामुळे आर्थिक ताण पडू लागला. त्यातच पाकिस्तानने अमेरिकडून युद्धकालात मदत मिळवण्याचे आश्वासन मिळवले.
३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. जोरदार हवाई हल्ले चढवून भारताची आक्रमण क्षमता खच्ची करण्याचे पाकिस्तानी तंत्र होते. पाकिस्तानने हल्ला तर केला परंतु त्यात त्यांचा फारसा फायदा झाला नाही उलट भारताला आक्रमण करायला सबळ कारण मिळाले व दुसर्या दिवशीच इंदिरा गांधींनी भारतीय सेनेला ढाकाच्या दिशेने आक्रमण करायचे आदेश दिले व भारताने औपचारिकरित्या युध्दाची घोषणा केली .
पश्चिम पाकिस्तानातून पाकिस्तानी लष्कराने भारतात अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सेनेपुढे त्याचे काही एक चालले नाही. त्यातील एका पुढे प्रसिद्ध झालेल्या लोंगेवालाच्या लढाईत त्यांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागले. केवळ १२० भारतीय सैनिकांनी २,००० पेक्षाही अधिक सैन्य असलेल्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला. सकाळ होताच भारतीय हवाई हल्यात पाकिस्तानी चिलखती (रणगाडा) तुकडीचे जबरदस्त नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले. अशा रीतीने पाकिस्तानी सेनेला पश्चिम सीमेकडे भारतीय मोर्चे विस्कळीत करण्यात अपयश आले. याउलट भारतीय सेनेने आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानच्या सीमेलगतचा एकूण १४,००० चौ.किमी इतका मोठा भूभाग काबीज केला. हा सर्व भाग नंतर सिमला कराराअंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला.
भारताचे जवळपास ४ हजार सैनिक या युद्धात कामी आले. पाकिस्तानच्या मृत सैनिकांची संख्या आजही निश्चित नाही. भारताने पाकिस्तानचे ९० हजाराहून अधिक सैनिक व समर्थक युद्धबंदी बनवले. या युद्धात मानवतेला काळिमा फासणार्या अनेक घटना घडल्या.
पाकिस्तानने केलेले मानवी शिरकाण हे उपखंडातील आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक मानले जाते पाकिस्तानी सेनेने अंदाजे २० ते ३० लाख लोक सामुहिक संहारात मारले असण्याची शक्यता आहे. जर हा आकडा खरा असेल तर हे कृत्य हिटलरच्या कृत्यांपेक्षाही क्रूर आहे. यात मुख्यत्वे बांगलादेशातील हिंदूंना मारण्यात आले.