Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था ठेऊन काम करावे

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था ठेऊन काम करावे

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आमच्या सरकारने विकासाच्या विविध प्रकल्पांना दिलेली गती लक्षात घेता नागरिकांच्या सोईचा महाराष्ट्र घडविण्याची वाटचाल सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था, जिव्हाळा ठेऊन काम करावे आणि आपल्या कारकीर्दीची छाप शहर विकासावर सोडावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यातील महापालिका आयुक्त, नगरपालिका, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना केले.

- Advertisement -

येथील एनसीपीएच्या सभागृहात नगरविकास दिनानिमित्त एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना शिंदे यांनी पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी यावेळी उपस्थित होते.

राज्यात नागरीकरण वेगाने होत आहे. त्यासाठी मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून वाढत्या नागरिकरणाला सोयी देण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही शिंदे यांनी यावेळी दिली. यंदा नगरविकास विभागाने घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांना देण्यात आलेल्या विविध पुरस्कारांच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्याच उपयोग शहराच्या सुशोभीकरणासाठी योग्य पद्धतीने करावा. शहरांची स्वच्छता करताना लोकसहभाग वाढवा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देण्यात येणाऱ्या सेवा गतिमान, दर्जेदार तसेच पारदर्शक पद्धतीने देण्यात याव्यात. प्रशासन लोकाभिमुख व्हावे यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी करांची वसुली १०० टक्के होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या शहरासाठी आपली नियुक्ती झाली त्या शहराचे आपण देणे लागतो या भावनेतून अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. नगरविकास विभागाने केंद्र शासनाकडे पाठविलेल्या १५ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. डबल इंजिन सरकार असल्याने त्याचा फायदा होतो, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

राज्यातील शहरे सुशोभित करताना तेथील इतिहास, संस्कृती यांचे दर्शन घडावे अशा पद्धतीने कामे करा. राज्यातील ज्या प्रगत महापालिका आहेत त्यांनी अन्य नगरपालिका, नगरपरिषदा यांना मार्गदर्शन करावे. जेणे करून महानगरांप्रमाणे छोटी शहरे देखील विविध विकास कामे आपल्या भागात राबवतील. विकासाचे निर्णय कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली.

शहरांमधील बदल दृश्यस्वरूपात जाणवले पाहिजे : फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. शहरांचा विकास करताना कल्पकता आणि अंमलबजावणी यांचा समन्वय योग्य प्रमाणात झाला पाहिजे. विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सेवा देणाऱ्या आहेत. शहरांमधील बदल दृष्यस्वरूपात जाणवले पाहिजे. अधिकाऱ्यांनी काम करताना आपल्या कारकीर्दीचा ठसा शहरा विकासावर उमटवला जाईल अशी कामगिरी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा २०२२ चा निकाल

शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा २०२२ चा निकाल यावेळी घोषित करण्यात आला. यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहा वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी या प्रमाणे पारितोषिक देण्यात आले. “अ” व” ब” वर्ग महानगरपालिका गटामध्ये नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. “क” वर्ग महानगरपालिका गटामध्ये नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय वआणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तर “ड” वर्ग महानगरपालिका गटामध्ये पनवेल महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अहमदनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

“अ” व” ब” वर्ग नगरपरिषद गटामध्ये शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, उमरखेड नगरपरिषद व हिंगोली नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.”क” वर्ग नगरपरिषद गटामध्ये वेंगुर्ला नगरपरिषद व महाबळेश्वर नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पवनी नगरपरिषद व सोनपेठ नगरपरिषद यांना देण्यात आले. नगरपंचायत गटामध्ये मौदा नगरपंचायत व देवरुख नगरपंचायत यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवळा (नाशिक) नगरपंचायत व बाभुळगाव नगरपंचायत यांना देण्यात आले.राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीची तपासणी व मूल्यमापन करण्यात आले. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण ५ गटातील प्रत्येकी ३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या