Tuesday, April 23, 2024
Homeनगरओबीसी शिष्यवृत्तीपासून जिल्ह्यातील 53 हजार विद्यार्थी वंचित

ओबीसी शिष्यवृत्तीपासून जिल्ह्यातील 53 हजार विद्यार्थी वंचित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत दिल्या जाणार्‍या विविध शिष्यवृत्या निधीअभावी रखडल्या आहेत. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतर मागासवर्गीय शिष्यवृत्ती जिल्ह्यातील 53 हजार विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून मिळालेली नाही. यासह अन्य शिष्यवृत्त्यांबाबत आगामी विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे आवाज उठविण्यात येईल. समाजकल्याण विभागाच्या सर्व शिष्यवृत्या सर्व विद्यार्थ्यांना मिळाल्याच पाहिजेत. याबाबत हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांना देखील जाब विचारला जाईल, असे प्रतिपादन आ. लहु कानडे यांनी केले.

- Advertisement -

शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघ, गुरुमाऊली मंडळ व परिवर्तन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आ. कानडे यांची भेट घेऊन समाजकल्याण खात्याच्या प्रलंबित शिष्यवृत्तींसह तालुक्यातील शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करून लक्ष वेधले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यातील पहिली ते दहावीत शिकणार्‍या ओबीसी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतर मागासवर्गीय शिष्यवृत्तीची रक्कम गेली दोन वर्षे मिळालेली नाही. सुमारे आठ कोटी रुपयांची ही प्रलंबित रक्कम वंचित असलेल्या 53 हजार विद्यार्थ्यांना तातडीने मिळावी याप्रश्नी आपण लक्ष घालावे, अशी विनंती आ. कानडे यांना केली असता त्यांनी तातडीने जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवढे यांना फोन करून याबाबत माहिती घेतली असता निधीअभावी ही शिष्यवृत्ती योजना रखडल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कानडे यांनी जिल्ह्यातील कोणकोणत्या शिष्यवृत्या प्रलंबित आहेत, याची तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश देत याप्रश्नी आगामी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.

तालुक्यातील शाळांचे वीज बिल न भरले गेल्यामुळे काही ठिकाणी वीज कनेक्शन कट करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींनी चौदा व पंधरा वित्त आयोगातून शाळांच्या वीज बिलाची रक्कम भरावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिलेले असताना देखील तालुक्यातील काही ग्रामपंचायतींकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. विजेअभावी शाळांमधील संगणक व इतर साहित्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहत असल्याचे शिक्षक प्रतिनिधींनी सांगितले. आ. कानडे यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करू, असे सांगितले.

तालुक्यातील शालेय ग्रंथालयांना आमदार निधीतून दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ही मागणी मान्य करत आगामी काळात तालुक्यातील शाळांना पुस्तके देण्याबाबत विचार करू, असे आश्वासन आमदार कानडे यांनी दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलिमखान पठाण, नूतन संचालक बाळासाहेब सरोदे, नूतन विश्वस्त प्रदीप दळवी, संघाचे जिल्हा प्रतिनिधी दीपक शिंदे, संघाचे तालुकाध्यक्ष शकील बागवान, गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष वाघमोडे, कार्याध्यक्ष शाम पटारे, सरचिटणीस सुनील घोगरे, परिवर्तन मंडळाचे जिल्हा नेते सतीश जाधव, राजाबाई कांबळे, केंद्रप्रमुख महादेव गर्जे, कुमार कानडे, कुमार शेवाळे, देविदास कल्हापुरे, ज्ञानदेव जाधव, बाळासाहेब दळवी यांनी सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या