अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मराठा समाजाचे नेते व संघटना जाहिरपणे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आहेत.
त्यामुळे ओबीसी व भटके विमुक्त समाजात संतापाची लाट उसळली असून जोपर्यंत ओबीसी, भटक्या समाजाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरूच राहणार आहे. मंगळवारी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येवून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच प्रश्न न सुटल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा जय भगवान महासंघाच्यावतीने अध्यक्ष रमेश सानप यांनी दिला.
यावेळी आनंद लहामगे, संजय आव्हाड, मदन पालवे, अमोल ढापसे, आशा पालवे, अलकनंदा पालवे, शशिकांत सोनवणे, जितेंद्र ढापसे, शरद मुर्तडकर, सुधाकर साबळे, महेश शिरसाठ, तुकाराम पालवे, आकाश खर्पे, सुभाष निंबाळकर, सुनीता पालवे, बाबासाहेब गर्जे, डॉ. श्रीकांत चेमटे आदी उपस्थित होते.
ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास जातीचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी 21 जुलैला राज्यातील ओबीसी व भटक्या विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक घेतली होती. त्यानंतर झालेल्या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन 9 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली. मात्र, आजही या समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत.
यात 2021 ची सार्वत्रिक जनगणना केंद्र सरकार जातनिहाय करणार नसेल तर राज्य सरकारने राज्यात जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये, कोणत्याही परिस्थितीत ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश होऊ नये, ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण करावे, पुढे ढकलण्यात आलेल्या एमपीएससी व अन्य सर्व प्रकारच्या परीक्षा दबावाची पर्वा न करता ताबडतोब घेण्यात याव्यात, अकरावीची प्रवेश प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात यावी, शासकीय सेवांमधील ओबीसीचा अनुशेष लवकरात लवकर भरण्यात यावा, 2019 ची बिंदूनामावली दिलेली स्थगिती उठवावी, ओबीसीच्या महाज्योती या संस्थेसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.