शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :
चुकीची माहिती देऊन अनेक नोकरदार, आयकर भरणार्यांनी पी.एम.किसान योजनेचा लाभ घेतला आहे.
पात्र नसतानाही लाभ घेणार्या शिरपूर तालुक्यातील 1 हजार 17 लाभार्थ्यांना तहसिलदारांनी नोटीस बजावली असून लाभ स्वरूपात घेतलेली रक्कम 15 दिवसांत शासन जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाने शेतकर्यांना आर्थिक सहाय्य म्हणुन वार्षिक सहा हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकर्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रूपये प्रमाणे रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यात नोकरदार, आयकर भरणार्या व महाभुधारक शेतकर्यांना वगळून अन्य शेतकर्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही काही शेतकर्यांनी माहिती दडवून पी.एम.किसान योजनेत अर्ज करून हा लाभ घेतला आहे.
याबाबत आयकर विभागाची यादी चाळून तालुकानिहाय लाभ दिलेल्या शेतकर्यांची पडताळणी करण्यात आली. त्यात अनेक शेतकर्यांनी माहिती दडवून लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाकडून तशी जिल्हानिहाय यादी तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकानिहाय यादी तयार करून ती तहसील कार्यालयांकडे पाठवण्यात आली आहे. प्राप्त यादीतील चुकीची माहिती देऊन लाभ घेणार्या शेतकर्यांना रक्कम वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
त्यात शिरपूर तालुक्यातील 1 हजार 17 लाभार्थ्यांना शासनाकडून तहसीलदारांमार्फत नोटीस बजावण्यात आली असुन 15 दिवसात रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अन्यथा कायदेशीर वसुली
नोटीस बजावल्यापासुन 15 दिवसांच्या आत ही रक्कम संबंधीत तलाठींकडे तहसीलदार शिरपूर पीएम-किसान या नावाने धनादेश (चेक) रक्कम समक्ष जमा करावी.
धनादेशाच्या पाठीमागील बाजुस आपले नाव व पीएम किसान बेनीफिशरी आय.डी ठळक स्वरूपात लिहावा. ही वसुल पात्र रक्कम 15 दिवसात प्राप्त न झाल्यास महाराष्ट्र जमिन महसुल संहिता 1966 मधील सक्तीच्या वसुली संदर्भात तरतुदी व नियमांचा उपयोग करून वसुली करण्यात येईल, असा इशाराच नोटीसव्दारे खोटी माहिती देऊन लाभ घेतलेल्यांना देण्यात आला आहे.