मुंबई l Mumbai
महाराष्ट्रातील विविध जिल्हयांतील पक्षांच्या रक्त आदी नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून त्यात बर्ड फ्लूची कोणतीही लक्षणे आढळलेली नहीत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक तसेच अंडी व मांस खाणा-यांना घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे आढळली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सर्वतोपरी काळजी राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.
या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांच्या घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या ५ राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. आतापर्यंत तरी यातील नमुन्यात बर्ड फ्लू आढळलेला नसल्याचे सुनील केदार यांनी सांगितले.
स्थलांतरीत होणा-या जंगलीपक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन करणा-या ठिकाणावर बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण अधिक प्रखरपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे निर्गमीत करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात अद्यापपावेतो वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळयांमध्ये अथवा कोबडयांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही.
त्यामुळे कुक्कुट पालक, अंडी व मांस खाणाऱ्या मांसाहारी नागरिकांनी अकारण घाबरण्याची परिस्थिती नाही.
तसेच स्थलांतरीत होणा-या जंगली पक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन होणाऱ्या ठिकाणावर असाधारण स्वरुपाचा मृत्यू आढळून आल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन केदार यांनी केले.