प्रशासन करोना मृत्यू का लपवतेय ?

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरच्या अमरधाममध्ये करोना मृत्यूंवर अंत्यसंस्कारास विलंब होत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे.

त्यातच करोना मृत्यूच्या संख्येत तफावत असल्याचे समोर येत असून काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे व बाळासाहेब पवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मनपा आरोग्य विभागाचा गलथान कारभार असल्याचा आरोप करत प्रशासन करोना मृत्यूंची संख्या का लपवतेय? असा सवाल वारे यांनी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांपासून करोना मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. करोना मृत्यूंवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. करोना मृत्यूच्या संख्येत तफावत असल्याचा संशय असल्याने वारे व बाळासाहेब पवार यांनी बुधवारी दुपारी अमरधाम स्मशानभूमीस भेट दिली.

करोना मृत्यूंवरील अंत्यसंस्काराबाबत मुलतानचंद बोरा ट्रस्टकडे वारे व पवार यांनी चौकशी केली असता, ट्रस्टकडून काल दुपारपर्यंत 456 करोना मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितल्याचे निखील वारे यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना वारे म्हणाले, मुलतानचंद बोरा ट्रस्टने करोना मृत व्यक्तींवरील अंत्यसंस्कारासंदर्भात आम्हाला पत्र दिले आहे. बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 456 जणांवर अंत्यसंस्कार केल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच यासंदर्भातील बिल बूक, रिपोर्ट त्यांनी दाखविले आहेत.

करोना मृत्यूंचा बुधवारचा सरकारी आकडा 300 आहे तर अमरधाममध्ये 456 जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत मोठी तफावत आढळून येत आहे. हिंदु धर्मातील व्यक्तींवर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. इतर जाती-धर्मातील करोना मृत्यूंचा आकडा वेगळा आहे.

त्यामुळे करोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा मोठा आहे. प्रशासन करोना मृत्यूंची संख्या का लपवित आहे, हे प्रशासनाने स्पष्ट केले पाहिजे. तसेच मृत्यूंचा खरा आकडा जनतेला सांगितला पाहिजे, अशी मागणी वारे यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *