नाशिक । प्रतिनिधी Nashik
करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या पंधरा हजारांच्या घरात गेली आहे. जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून करोना विषयक सुरक्षा नियमांची जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले असून नाशिककरांनी स्वयंशिस्त पाळावी अशी साद त्यांनी घातली.
जिल्हाधिकारी मांढरे यांनी रविवारी (दि.२१) व्हिडिअोद्वारे जनतेशी संवाद साधत वाढत्या करोना संकटाबाबत नागरिकांना जागृत करत संकट किती भयानक आहे याची माहिती दिली. मागील वर्षी करोना संकट आल्यावर पंधरा हजार रुग्ण संख्या पार करायला दोन ते तीन महिने लागले. मात्र, आता दोन तीन आठवडयातच रुग्णांचा ऐवढा आकडा पार झाला असून प्रशासनासमोर तीन आव्हाने आहेत.
सर्वात पहिले आरोग्य यंत्रणेचा सेटअप उभे करणे, नागरिक आता करोनाला घाबरत नाही. करोना लागण झालेले रुग्ण घरीच उपचार घेउन माहिती लपवतात. त्यामुळे करोना स्प्रेड होत आहे. तर तिसरे आव्हान म्हणजे कारवाईने नियंत्रण मिळवायचे की प्रबोधन करुन. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत आपण ‘मी जबाबदार’ भिंतीचित्र पत्रकाचे अनावरण केले.
करोनाबाबत जनजागृती करणे आवश्यक असून आता स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे अशी साद त्यांनी घातली. तसेच नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.